जबरदस्त अभिनय आणि स्टायलीश लूकच्या जोरावर ९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारा राहुल रॉय आजही लोकप्रिय अभिनेता म्हणून चर्चेत असतो. ज्याप्रमाणे आज सलमान खानच्या लग्नाची चर्चा असते. त्याचप्रमाणे कधीकाळी राहुलच्या देखील लग्नाची चर्चा होत असे. त्याच्या प्रेयसींचे फोटो वृत्तमाध्यमांमध्ये झळकत असत. परंतु ‘आशिकी’ फेम राहून रॉय आजही बॅचलरच आहे. अलिकडेच त्याने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने लग्न न करण्याचे कारण सांगितले.

राहुलने लग्न का केलं नाही?

महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने राहुल रॉयला सुपरस्टार केले. १९९० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अलिकडेच ३० वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाची तीशी साजरी करण्यासाठी राहुलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कपिलने त्याची फिरकी घेत अद्याप लग्न न करण्याचे कारण विचारले.

कपिल म्हणाला, “राहुल सर तुमचा ‘जूनून’ हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात तुम्ही रोज रात्री वाघाचं रुप घेता. कदाचित हेच तर तुमच्या बॅचलर असण्याचं कारण तर नाही ना?”

या प्रश्नावर राहुल म्हणाला, “या गुप्त गोष्टीला गुप्तच राहू दे.” राहुलने दिलेले उत्तर ऐकून एकच हास्यकल्लोळ झाला.

कपिलने या मुलाखतीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक तरुणींना डेट करणारा राहुल अद्याप बॅचलर आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे.