रेश्मा राईकवार मुलीला सासरी पाठवताना सासू-सासरे, नवरा यांच्याशी कसे वागायचे? स्वत: कमीपणा घेऊन घरासाठी कसे झटत राहायचे? हा तथाकथित आदर्श वस्तुपाठच आजही अनेक घरांमधून दिला जातो. मुलगा कर्ता झाला की त्याचे लग्न झाले पाहिजे आणि लग्नाची पहिली रात्र सरत नाही तोपर्यंत घरात पाळणा हलला पाहिजे आणि याच पद्धतीने संसार नांदता झाला पाहिजेचा धोशा सुरू होतो. या सगळ्या गणितांत आपण लग्न का करतो आहोत? याबद्दलची स्पष्ट जाणीव दूरच मुळात प्रेमात पडणं, प्रेमातला प्रणय याच्याही भ्रामक कल्पनाच मुख्यत्वे चित्रपटांच्या आधारे तरुण-तरुणींच्या मनात भरलेल्या असतात. या सगळ्याक डे लक्ष वेधत लैंगिक शिक्षण हे आजच्या काळात किती गरजेचे आहे हे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी ‘आटपाडी नाईट्स’च्या माध्यमातून केला आहे. बेडरूममधील गोष्ट पडद्यावर आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा दिग्दर्शकाने केला आहे आणि तो बव्हंशी खराही आहे. मराठी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचा विषय मांडणे हे एकाअर्थी निर्माता-दिग्दर्शकांचे धाडसच आहे. आटपाडी गावच्या वसंत खाटमोडे (प्रणव रावराणे) नामक तरुणाची आणि त्यातही त्याला रात्री ज्या समस्येचा सामना करावा लागतो आहे, त्याची ही गोष्ट आहे. वसंता तब्येतीने किडकिडीत असल्याने त्याचे लग्न जमत नाही आहे. त्याच्या बारीक असण्यामुळे त्याला मित्रांकडून, गावकऱ्यांकडून सतत टिंगलटवाळीला सामोरे जावे लागते. हे सगळे वरवर हसण्यावारी नेणाऱ्या वसंताचे अखेर लग्न जमते. आणि त्याला प्रियासारखी (सायली संजीव) सुंदर मुलगी पत्नी म्हणून मिळते. मात्र, आपल्या बारीक असण्याबद्दलचा न्यूनगंड आधीच वसंताला आतून पोखरत असतो, त्यात लग्नानंतर तुला झेपेल का? ही गावकऱ्यांची चेष्टा त्याला अधिक जिव्हारी लागते. कुठलीही अडचण नसतानाही तणावात वावरणारा वसंता यातून नको त्या आग्रहाला बळी पडतो आणि लग्नानंतर लैंगिक संबंध चांगले राहावेत यासाठी नको त्या गोळ्या घेतो. लैंगिक संबंधांबद्दलच्या भ्रामक कल्पनांमधून वसंता बाहेर येतो का? या सगळ्याचा प्रियावर काय परिणाम होतो? ही गोष्ट फक्त वसंता-प्रियापुरती मर्यादित राहात नाही. तर खाटमोडे कुटुंबातही काय उलथापालथ होते, हे दाखवत बंद दारामागच्या या विषयाचे गांभीर्य समजावून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सुपेकर यांनी केला आहे. सध्या शहरे काय आणि गावखेडी काय? सगळ्यांकडे टीव्ही आणि मोबाइल हेच माहितीचे मुख्य स्रोत आहेत. त्याच अर्धवट माहितीच्या आधारे प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यांच्याकडे ही उत्तरे असली पाहिजेत ते पालक मुळातच तथाकथित संकोचापायी अनेक प्रश्न गिळून हे काय समजावून सांगायला हवे का, असा पवित्रा घेतात. पाण्यात पडला आहे तर पोहायला शिकेलच की ही उक्ती नको त्या ठिकाणी प्रमाण मानून वागण्याने साध्य काहीच होत नाही. पालक आणि मुलांमध्ये असलेला संवादाचा अभाव, डॉक्टरांकडून सल्ला घेण्यापेक्षा समाज शेण घालेल तोंडात ही भावना समस्या सोडवण्यापेक्षा दडवण्यासच भरीस पाडते. या सगळ्या गोष्टी दिग्दर्शकाने कथेच्या ओघात दाखवून दिल्या आहेत. मात्र चित्रपटाचा जो मूळ विषय आहे त्यावर दिग्दर्शकाने अधिक भर द्यायला हवा होता, असे वाटत राहते. लैंगिक शिक्षणाची गरज आणि लैंगिक समस्या असल्यास डॉक्टरी उपाय समजून घेणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. कथा सांगण्यामागचा दिग्दर्शकाचा उद्देश तोच आहे, पण गंभीरपणे सांगण्यापेक्षा खेळकर, विनोदी शैलीत त्या दिग्दर्शकाने मांडल्या आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत ही क था सहज पोहोचेल. पण या सहजपणाच्या नादात या विषयाला अधिक अभ्यासपूर्वक मांडण्याची संधी दिग्दर्शकाने घेतली नाही हे जाणवल्याशिवाय राहात नाही. बाकी आटपाडी गावातली ही गोष्ट असल्याने गावातली सधन मंडळी, त्यांची तरुण मुलं-मुली, मित्रांमित्रांमधली दारू आणि चकण्यावर चालणारी खलबतं, मागचा पुढचा विचार न करता उगाचच एखाद्याची खेचत राहणं आणि त्याहीपलीकडे वडीलधाऱ्यांचा मान, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच गोष्टी व्हायला हव्यात हा अट्टहास अशा अनेक गोष्टी दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडल्या आहेत. या चित्रपटातील सगळेच कलाकार उत्तम आहेत. बहुचर्चित असे कलाकार न घेता मुख्य जोडीसाठी केलेली प्रवण रावराणे आणि सायली संजीव या दोघांची निवड अगदी योग्य ठरली आहे. या दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखा उत्तम निभावल्या आहेत. याशिवाय, छाया कदम, संजय कुलकर्णी, आरती वडगबाळकर आणि समीर खांडेकर यांनीही वसंताची ‘फॅ मिली’ अप्रतिम रंगवली आहे. कथा-पटकथा-संवाद या तिन्ही जबाबदाऱ्या दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनीच पेलल्या आहेत. वेगळी बोली आणि ठसक्यातले संवाद चित्रपट रंजक करतात. पण अगदी विसाव्या शतकातील अत्याधुनिक देश आणि जगाच्या गोष्टी करतानाही लैंगिक संबंधांबद्दलचे ज्ञान पॉर्न फिल्मच्या आधारेच घेणारे आपण अजूनही या गोष्टी जाहीरपणे बोलत नाही, चर्चा करत नाही. त्यामुळे कधीच न बोलल्या जाणाऱ्या या गोष्टीला केवळ स्पर्श करण्यापेक्षा अधिक खोल मांडणी झाली असती तर ही ‘आटपाडी नाइट्स’ची गोष्ट सुफल संपूर्ण झाल्याचे समाधान वाटले असते. दिग्दर्शक - नितीन सुपेकर कलाकार - प्रणव रावराणे, सायली संजीव, छाया कदम, संजय कुलकर्णी, सुबोध भावे, आरती वडगबाळकर, समीर खांडेकर, योगेश इरतकर, जतिन इनामदार.