‘माझा फ्लॉप चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमीत कमी १०० कोटींची कमाई करतो, तेव्हा मी आयुष आणि वरिनाला सांगून ठेवलंय की तुमचा चित्रपट फ्लॉप जरी झाला तरी त्यानं बॉक्स ऑफिसवर कमीत कमी १६० कोटींची कमाई केलीच पाहिजे.’ काही दिवसांपूर्वी ‘लव यात्री’च्या प्रमोशन दरम्यान सलमाननं आपली फारच मोठी अपेक्षा या दोन्हीं कलाकारांकडे बोलून दाखवली होती.

मात्र सलमानच्या अपेक्षावर पूर्णपणे पाणी फेरलं आहे. या चित्रपटानं आतापर्यंत ६.५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आयुषसाठी सलमानच्या अपेक्षांचा पल्ला गाठणं अवघड ठरणार आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. गोष्ट तिच आहे मात्र कलाकार बदलले आहेत, अशा प्रकारच्या प्रेमकथेवर असंख्य चित्रपट बॉलिवूडमध्ये आलेत म्हणूनच वरिना आणि आयुषच्या प्रेमकथेला प्रेक्षकांचाही अल्प प्रतिसाद लाभला.

तसेच याच दिवशी आयुषमान खुराना, तब्बू आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अंधाधून’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ‘लव यात्री’ला चांगलीच टक्कर दिली आहे. त्यामुळे ‘अंधाधून’ चा फटका ‘लव यात्री’लाही बसताना दिसत आहे.