बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दिग्दर्शक अभिनव कश्यप याने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. शिवाय सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी माझं देखील करिअर संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, असाही धक्कादायक आरोप अभिनवने केला आहे.

नेमकं काय म्हणाला अभिनव?

अभिनव प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ आहे. त्याने सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने एक लांबलचक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्याने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. शिवाय सलमान खान आणि यश राज फिल्म्स यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

“बॉलिवूडमधील नेपोटिझमने माझं देखील शोषण केलं. ‘दबंग’सारख्या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतरही माझी ही हालत आहे. अरबाज खानला चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं होतं म्हणून माझ्याकडून ‘दबंग २’ काढून घेण्यात आला. याविरोधात मी आवाज उठवला. म्हणून त्यांनी इतर प्रोजेक्टही माझ्याकडून काढून घेतले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली. अष्टविनायक फिल्म्स, वायाकॉम पिक्चर्स यांसारख्या अनेक कंपनींसोबत केलेले करार रातोरात मोडले गेले. सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी माझं करिअर संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.” अशा आशयाची पोस्ट अभिनवने लिहिली आहे.