सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेता विवेक ओबेरॉय एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. अभिषेक आणि विवेक त्यांचे जुने वाद वसरुन त्यांच्यामध्ये पुन्हा मैत्रीचे नाते निर्माण होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यांचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमादरम्यानचा आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. तिच्या या कामगिरीसाठी मुंबईमध्ये सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी तेथे हजेरी लावली होती. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे मुलगा अभिषेक बच्चनसोबत तेथे उपस्थित होते. तर दुसरीकडे अभिनेता विवेक ओबेरॉय वडिल सुरेश ओबेरॉय आणि पत्नी प्रियांकासोबत या कार्यक्रमला उपस्थित होता. सुरेश ओबेरॉयने अमिताभ यांना पाहताच मिठी मारली.

काही वेळानंतर अभिषेक आणि विवेक एकमेकांसमोर आले आणि त्यांनीदेखील एकमेकांना मिठी मारली आहे. त्या दोघांची मिठी चाहत्यांसाठी सुखद धक्काच होता. आता विवेक आणि अभिषेक जुने वाद विसरुन त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण करणाक का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिषेक आणि विवेकमध्ये थेट वाद नसले तरी ऐश्वर्यामुळे त्यांच्यामध्ये वाद असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघेही एकमेकासमोर येणे टाळतात. काही दिवसांपूर्वी विवेकने ट्विटरवरून ऐश्वर्या रायच्या फोटोचे एक मीम शेअर केले होते. त्यानंतर विवेकला ट्रोलही करण्यात आले होते. शेवटी विवेकने माफी मागत पोस्ट डिलीट केली होती.

ऐश्वर्या आणि सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉयशी जोडण्यात आले होते. विवेकचे ऐश्वर्यावर प्रचंड प्रेम होते. परंतु त्यांचे रिलेशन फार काळ टिकले नाही. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर अभिषेक आणि विवेक यांच्यातील मैत्रीचे नाते तुटल्याचे म्हटले जात होते. ते दोघे एकमेकासमोर येणे टाळत होते. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दोघे एकमेकांसमोर आले.