‘चिमण, अरे चिमण्या हा काय घोळ घालून ठेवला आहेस तू, आता तो मलाच निस्तरावा लागणार’ किंवा ‘मावशी, अगं मला भूक लागली आहे, पहिल्यांदा काहीतरी खायला तरी दे’ असे संवाद आठवले की डोळ्यांसमोर डोक्यावर पगडी, झुबकेदार मिशा, हातात सोटा घेतलेली, मोठय़ा आवाजात बोलणारी व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. स्पष्ट आणि खणखणीत आवाज हे त्या व्यक्तीचे वैशिष्टय़. आज चाळीस वर्षांनंतरही ‘त्या’ व्यक्तीची ओळख पुसली गेलेली नाही. ती व्यक्ती ‘त्या’ विशिष्ट नावानेच ओळखली जाते. होय ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे ऊर्फ ‘गुंडय़ाभाऊ’..
मुंबई दूरदर्शनवरून सादर झालेली ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ ही मालिका खूप गाजली. अगदी अमराठी प्रेक्षकांमध्येही ही मालिका लोकप्रिय होती. बाळ कर्वे यांनी त्यानंतर दूरचित्रवाहिन्यांवरील अनेक मालिका, चित्रपट आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध भूमिका रंगविल्या पण प्रेक्षकांच्या मनात ‘गुंडय़ाभाऊ’ अद्यापही ठसलेला आहे. हे त्या भूमिकेचे यशच म्हणायला पाहिजे. विनोदी लेखक चि. वि. जोशी यांनी लिहिलेल्या ‘चिमणराव व गुंडय़ाभाऊ’च्या गोष्टींवर ही मालिका आधारित होती. छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून घडणारी सहज विनोदनिर्मिती, खळाळून हसविणारा निखळ विनोद आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मालिकेतून सहजपणे मांडण्यात आला होता.
‘पुनर्भेट’च्या निमित्ताने बाळ कर्वे यांच्याशी गप्पांना सुरुवात करताना साहजिकच ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ हा विषय अग्रभागी होता. त्या काळातील मालिकेच्या आठवणींचा पट उलगडताना कर्वे म्हणाले, मुंबई दूरदर्शन केंद्रावरील निर्माते याकुब सईद आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मनात ही मालिका करायचा विचार आला. सुरुवातीला चिमणराव व गुंडय़ाभाऊ म्हणून दिलीप प्रभावळकर आणि माझे नाव नव्हते. सांगितले तर आश्चर्य वाटेल पण ‘चिमणराव’ आणि ‘गुंडय़ाभाऊ’ या भूमिकांसाठी अनुक्रमे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर आणि धुमाळ यांच्या नावांचा विचार झाला होता. पण काही कारणाने या दोघांनाही काम करणे जमणार नव्हते. अभिनेते शरद तळवलकर यांनीच ‘गुंडय़ाभाऊ’साठी माझे नाव सुचवले. दिलीप प्रभावळकर तेव्हा ‘पंचवीस एके पंचवीस’ हा कार्यक्रम करीत होते. त्यांचे नाव चिमणराव म्हणून नक्की झाले आणि पुढे या मालिकेने इतिहास घडवला. दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी सायंकाळी सात वाजता ही मालिका प्रसारित होत होती. मालिकेचे ३७ भाग प्रसारित झाले. मालिकेचे सुरुवातीचे लेखन व. पु. काळे यांनी केले तर नंतर ही जबाबदारी श्रीधर घैसास यांनी सांभाळली.
‘गुंडय़ाभाऊ’कडे असलेला ‘सोटा’हे त्या भूमिकेचे एक खास वैशिष्टय़ होते. ‘चिवि’ हे लेखक म्हणून खूप मोठे होतेच. त्यांचे द्रष्टेपणही त्यांच्या या लेखनातून जाणवते. त्यांचे हे लेखन १९६० ते १९६४ या काळातील आहे. आजकाल ‘डॉक्टरांची कटप्रॅक्टिस’ समोर आली आहे. ती गोष्ट त्यांनी तेव्हा लिहिली होती. घरकाम करणाऱ्या महिला कामगार काम करण्यापूर्वी काही अटी घालतात, तेही त्यांनी एका कथेत लिहिले होते. या मालिकेचे सर्व चित्रीकरण दूरदर्शनच्याच स्टुडिओत व्हायचे. त्या भागाचे चित्रीकरण करण्यापूर्वी आम्ही सर्व अगोदर तालीम करत असू. मालिका लोकप्रिय झाल्यानंतर हिंदीतही त्याचे काही भाग सादर झाले पण काही भागांनंतर ते बंद पडले. मालिकेच्या लोकप्रियतेनंतर ‘चिमणराव आणि गुंडय़ाभाऊ’हा चित्रपटही प्रदर्शित झाला. विजय तेंडुलकर यांनी त्याचे लेखन केले होते. पण तो विशेष चालला नाही, अशी आठवणीही कर्वे यांनी सांगितली.
कर्वे कुटंबीय पुण्याचे. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. त्यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले.
पुढे नोकरीसाठी ते मुंबईत आले. बृहन्मुंबई महापालिकेत त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. परीक्षा आणि मुलाखत आदी सोपस्कार पार पडून ते महापालिकेत नोकरी करू लागले. २१ मे १९६२ मध्ये ते महापालिकेत नोकरीला लागले आणि ३२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. बदली झाली तरी मुंबईतच होईल अन्य कुठे जावे लागणार नाही, म्हणून त्यांनी महापालिकेखेरीज अन्य दुसऱ्या नोकरीचा विचार केला नाही. नोकरीत असताना सहकारी आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे त्यांना नाटक, चित्रपट दौरे करता आले.
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता या त्यांच्या नाटय़ क्षेत्रातील गुरु. ज्येष्ठ अभिनेते माधव वाटवे हे त्यांचे शेजारी. विलेपार्ले येथे एकाच सहकारी गृहनिर्माण संस्थेत ते राहायचे. साहित्य संघात ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला वाटवे हे कर्वे यांना घेऊन गेले होते. तेथे ‘रंगायन’ची अनेक मंडळी होती. पुढे कर्वे यांनी ‘रंगायन’मध्ये प्रवेश केला. यातून ‘लोभ नसावा ही विनंती’ हे विजय तेंडुलकर यांचे नाटक त्यांनी राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केले. नाटकाला पारितोषिकही मिळाले. ‘रंगायन’संस्थेतही त्यांनी काही काळ काम केले. ‘रंगायन’च्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’या नाटकाचे प्रयोग जर्मनी येथे झाले. त्या दौऱ्यात प्रयोगाच्या वेळी ‘सेट’चे सर्व काम कर्वे यांनी पाहिले. विमानातून नेता येतील, असा घडीचा सेट त्यांनी तयार केला होता. यातून पुढे ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बॅरिस्टर’ आदी नाटकात बदली कलाकार म्हणूनही काम केले. साहित्य संघाचे ‘संध्याछाया’ हे कर्वे यांचे पहिले व्यावसायिक नाटक. यात विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात छोटी भूमिका कर्वे यांच्या वाटय़ाला आली होती पण आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या भूमिकेत असे काही रंग भरले की ती भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. इथून पुढे कर्वे यांचा नाटय़प्रवास सुरू झाला. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ आदी नाटकेही त्यांनी केली. माधव वाटवे यांनी दिग्दर्शित केलेले ‘आम्ही लटिके ना बोलू’ हे नाटकही त्यांनी केले. यात त्यांच्यासोबत नाना पाटेकर होते. भक्ती बर्वे यांच्या बरोबरचे ‘आई रिटायर होते’ हे नाटक खूप गाजले. याच नाटकासाठी त्यांना राज्य शासनाचा ‘सवरेत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कारही मिळाला. आजवरच्या अभिनय कारकीर्दीत मिळालेला हे एकमात्र पुरस्कार असल्याचे ते सांगतात. कर्वे यांची सुरुवात बालनाटय़ापासून झाली. विलेपार्ले येथील सुमंत वरणगावकर यांच्या ‘रंगमंच किलबिल’ संस्थेतर्फे त्यांनी काही बालनाटय़े सुरुवातीला केली होती.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची सूत्रे मोहन जोशी यांच्याकडे आली आणि त्यांनी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिराच्या डागडुजीचे व पुनर्बाधणीचे काम हाती घेतले. त्या वेळी कर्वे यांनी आपण स्थापत्य अभियंता व अभिनेता अशा दोन्ही भूमिकेत काम केलेले असल्यामुळे नाटय़गृहाच्या दुरुस्तीच्या कामात आपल्याला काम करायची इच्छा त्यांनी जोशी यांच्याकडे बोलून दाखविली होती. जोशी यांनी हिरवा कंदील दिल्याने नाटय़गृहाची दुरुस्ती आणि फेररचना यात कर्वे यांनी मोलाचे योगदान दिले. हे सर्व काम त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता नि:शुल्क केले. सध्या नाटय़ परिषदेचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहत आहेत.
कर्वे यांनी दहा ते पंधरा मराठी चित्रपट केले. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांची अगदी लहान भूमिका होती. ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ हे त्यांचे काही चित्रपट. ‘बन्याबापू’ या चित्रपटात ते चक्क नायिकेबरोबर बागेत फिरताना आणि गाणे म्हणताना पडद्यावर दिसतात. सरला येवलेकर त्यांची नायिका होती. त्या दोघांवर चित्रित झालेले ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. त्याबाबत आठवण सांगताना कर्वे म्हणाले, लेखक वसंत सबनीस यांनी या चित्रपटासाठी मला विचारले. खरे तर नायक म्हणून किंवा बागेत झाडांभोवती उडय़ा मारत गाणे म्हणण्यासारखा माझा चेहराही नाही. पण ती भूमिका मी स्वीकारली. मोहन गोखले व मी आम्ही त्यात प्रमुख कलाकार होतो. बेळगाव येथील ‘पार्वती’ चित्रपटगृहात हा चित्रपट सलग १९ आठवडे चालला. बेळगावात मराठी चित्रपटाने केलेला तो विक्रम आहे. या चित्रपटातील गाण्याची एक गंमत आहे. काही कामानिमित्त मी लोणावळा येथे गेलो होतो. बच्चे नावाच्या गृहस्थांच्या गाडीतून जाताना ते म्हणाले, गाणे लावू का, मी होकार दिल्यानंतर त्यांनी जे गाणे लावले ते ‘प्रीतीचे झुळझुळ पाणी’ हे होते. बच्चे मला म्हणाले, हे गाणे माझे खूप आवडते आहे. या गाण्यानेच माझ्या दिवसाची सुरुवात होते. यावर मी त्यांना विचारले, हे गाणे कोणावर चित्रित झाले ते माहिती आहे का?’ त्यांनी ‘हं.. आहे एक कोणी तरी फडतूस नट’, असे मला उत्तर दिले. त्यावर मी त्यांना ‘तो फडतूस नट मी आहे’, असे सांगताच ते उडालेच. सई परांजपे यांचा ‘कथा’ हा त्यांनी केलेला एकमात्र हिंदी चित्रपट. हिंदीत ते फारसे रमले नाहीत.
दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या गजानन जहागीरदार दिग्दर्शित ‘स्वामी’ या मालिकेतील त्यांनी साकार केलेला ‘गंगोबा तात्या’ गाजला. खलनायक असलेल्या या पात्राच्या तोंडी असलेला ‘काय’ हा शब्दप्रयोग लोकप्रिय झाला. ‘महाश्वेता’ या मालिकेतही ते होते. ‘प्रपंच’, ‘वहिनीसाहेब’ तर अलीकडच्या ‘राधा ही बावरी’ आणि ‘उंच माझा झोका’ या मालिकेतूनही कर्वे यांच्या अभिनयाचे दर्शन झाले. वीरेंद्र प्रधान याच्या आग्रहाखातर ‘उंच माझा झोका’ या मालिकेच्या एकाच भागात त्यांनी ‘गणेश शास्त्री’ ही वैद्यराजांची भूमिका रंगविली आणि त्या छोटय़ाशा भूमिकेतही ते छाप पाडून गेले. कर्वे यांच्या पत्नी नीला या गेल्या दोन-चार वर्षांपासून आजारी असल्याने त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी घरी थांबावे लागते. त्यामुळे बाहेर काम करण्यावर काही मर्यादा आल्या आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी असे त्यांचे सुखी कुटुंब आहे. सून, नातवंडे, जावई हा आता त्यांचा परिवार.
मुलगा हा स्थापत्य अभियंता असून मुलगी स्वाती वाघ या साठय़े महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्यांचा जावई मिलिंद वाघ हाही अभिनय क्षेत्रात आहे. वयाच्या ७८ व्या वर्षांत असलेले कर्वे यांनी नाटक, चित्रपट यात काम करणे थांबविले असले तरी मालिके तून चांगली भूमिका मिळाली तर ते करतात. भूमिका त्यांना आवडली तरच ते काम स्वीकारतात. हल्लीच्या मालिका ते पाहतात. पण ‘रिअॅलिटी शो’च्या नावाखाली सुरू असलेले विनोदाचे कार्यक्रम त्यांना आवडत नाहीत. ओढूनताणून केलेले विनोद, अशुद्ध मराठी त्यांना अस्वस्थ करते. आयुष्याच्या या वळणावर ते कृतार्थ, आनंदी आणि समाधानी आहेत. आज एखादी भूमिका मिळावी म्हणून ते कशाही मागे धावत नाहीत. पण चांगली भूमिका मिळाली तर करायची त्यांची इच्छा आहे. ते चांगल्या भूमिकेची वाट पाहात आहेत..

चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ मालिकेने प्रसिद्धी तर दिलीच पण आयुष्यभर मनात जपून ठेवाव्यात अशा आठवणीही दिल्या. एक आठवण तर मला राष्ट्रपती पदकापेक्षाही मोलाची आहे. आमची मालिका प्रत्येक घराघरातून पाहिली जात होती. मालिकेचा भाग प्रसारित झाल्यानंतर दूरदर्शनकडे तसेच आम्ही कलाकारांनाही प्रेक्षकांकडून पत्रे यायची. एका प्रेक्षकाकडून आलेले ते पत्र म्हणजे माझ्या आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे. ‘माझे वडील कर्करोगाने आजारी असून कर्करोग शेवटच्या स्थितीत आहे. ते त्यांच्या खोलीतून बाहेरही पडत नाहीत. त्यांचे शेवटचे काही दिवस आता शिल्लक आहेत. पण तुमची ही मालिका लागली की वडील मला उचलून हॉलमध्ये न्या, मला ती मालिका पाहायची आहे, असे सांगायचे. आम्ही त्यांना उचलून नेऊन दूरदर्शन संचासमोर बसवायचो. ती मालिका म्हणजे त्यांचे जगण्याचे ‘टॉनिक’ होते. तो अर्धा तास ते खूप आनंदात असायचे. सर्व वेदना, दु:ख विसरायचे. तुम्ही त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना जो निखळ आनंद दिलात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद,’ असे त्या पत्रात म्हटले होते. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या माणसाला आपण काही क्षण का होईना आनंद देऊ शकलो याचे मला समाधान आहे. -बाळ कर्वे

शेखर जोशी,