‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या निमित्ताने घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे भारत गणेशपुरे. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे भारत आज पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. बसला ना तुम्हालाही धक्का?

भारत गणेशपुरे यांचं १८ वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे आणि एक मुलगासुद्धा आहे. मग आता पुन्हा कोणाशी लग्नगाठ बांधणार असा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? तर ते आपल्या पत्नीसोबतच पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. गोरेगाव इथल्या त्यांच्या राहत्या घरीच हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडणार आहे.

आता पत्नीसोबतच पुन्हा लग्न करण्याचे कारण काय? तर ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमसोबत जगप्रवासाला निघालेल्या भारत यांना कुटुंबीयांसोबत, पत्नीसोबत पुरेसा वेळ व्यतित करता आला नाही. शिवाय नव्या घरात शिफ्ट झाल्यापासून नातेवाईकांशीही भेटणं-बोलणं जमलं नाही. व्यग्र कामकाजातून वेळ काढत मग सगळ्यांना एकत्र बोलवायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडला. त्यावर तुम्ही पुन्हा एकदा लग्न करा म्हणजे सगळेजण पुन्हा एकत्र येतील, असं गमतीशीर उत्तर श्रेया बुगडेनं दिलं. भारत यांनी हे चांगलंच मनावर घेतलं आणि थेट मुहूर्त काढला.

कालच या दाम्पत्याची हळद झाली आणि आज मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपूर्ण लग्नविधी पुन्हा होणार आहेत. श्रेया बुगडेने सोशल मीडियावर त्याचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. चला तर मग भारत गणेशपुरे यांना पुन्हा एकदा लग्नाच्या शुभेच्छा देऊयात..