अभिनेता इमरान हाश्मी अभिनीत ‘राज रिबूट’ या चित्रपटालासुद्धा पायरसीचे गालबोट लागले आहे. प्रदर्शनाआधीच मंगळवारी हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याची माहिती हाती आली. चित्रपटाच्या लीक होण्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि पाहता पाहता ट्विटरवर विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘राज रिबूट’ या चित्रपटाचा #RaazRebootLeaked हा ट्रेंडच आला. एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठीच्या लिंक इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहेत. पायरसीच्या विरोधात आवाज उठवत अभिनेता इमरान हाश्मीने ट्विट करत रसिकांना चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

इमरानने त्याच्या ट्विटमध्ये ‘मी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. हे एक असे माध्यम आहे ज्याच्या मदतीने मी अगदी सहजपणे चाहत्यांशी जोडला जातो. पण, काही वेळापूर्वीच मला अशी माहिती मिळाली आहे, कि ‘राज रिबूट’ हा चित्रपट लीक झाला आहे. एक चित्रपट बनवण्यासाठी त्यामागे फार मेहनत घेतली जाते, अनेकजण फक्त रसिकांच्या मनोरंजनासाठी इतकी मेहनत घेतात. गेला काही काळ मी पाहतो आहे की, अनेक चित्रपट पायरसीचा शिकार होत आहेत. यासाठी मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही पण रसिकांना एकच आवाहन करु इच्छितो की त्यांनी चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पाहावा’, असे लिहिले होते.

इमरानच्या या भयपटाआधी ‘उडता पंजाब’, ‘सुलतान’, ‘ग्रेट ग्रॅंड मस्ती’ यांसारखे चित्रपटही पायरसीच्या जाळ्यात अडकले होते. ‘राज’ या भयपटाचा पुढचा भाग ‘राज रिबूट’ या चित्रपटात इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. यावेळी इमरान हाश्मी बरोबर दाक्षिणात्य सिनेमांची अभिनेत्री कृती खरबमदाही दिसणार आहे. तर ‘लव्ह गेम्स’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलेला अभिनेता गौरव अरोडाचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
येत्या १६ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भट्ट कॅम्पने केलेले आतापर्यंतचे सगळेच भटपट हे प्रेक्षकांना घाबरवू शकले नाहीत. त्यामुळे हा ‘राज रिबूट’ प्रेक्षकांना घाबरवण्यात कितपत यशस्वी ठरेल हे तर सिनेमा प्रदर्शनानंतर कळेलच.

‘राज रिबूट’च्याआधी राजचे तीन सिनेमे येऊन गेले आहेत. ‘राज’ मालिकेतला सगळ्यात पहिला सिनेमा ‘राज’ २००२ मध्ये आलेला. यात बिपाशा बासू आणि दिनू मोर्या होते. यानंतर २००९ मध्ये ‘राजः द मिस्ट्री कन्टिन्यूज’ हा सिनेमा आला. यात कंगना रानौत, इमरान हाश्मी आणि अध्ययन सुमन यांची महत्त्वाची भूमिका होती. २०१३ मध्ये ‘राज ३’ हा सिनेमा प्रदर्शित झालेला. यातही इमरान हाश्मी याची मुख्य भूमिका होती. इमरान हाश्मी बरोबर या सिनेमात बिपाशा बासू आणि ईशा गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या तीनही सिनेमांमध्ये सगळ्यात यशस्वी सिनेमा हा फक्त ‘राज’च राहिला आहे.