करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम मालिकांच्या शूटिंगवरही झाला. मार्च महिन्यापासून सर्वच मराठी, हिंदी मालिकांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील सर्व काम जवळजवळ बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून अनेक मालिकांचे शूटिंग सुरु झालं असून विशेष काळजी घेत मालिका चित्रित करण्यात येत आहे. अल्पावधीमध्येच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेची शुटींग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरु झालं. जवळपास तीन महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात झाल्याने छोट्या पडद्यावरील कलाकारांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली असून बबड्या उर्फ आशुतोष पत्कीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला होता. मात्र असं असलं तरी या मालिकेच्या कथानकावरुन अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट आणि खास करुन बबड्या आणि त्याची सोशल नेटवर्किंगवर ट्रोलिंग केलं जातं. अशाच एका पोस्टवर मालिकेतील प्रमुख कलाकारांपैकी एक असणाऱ्या गिरीश ओक यांनी, "आम्ही जीव धोक्यात टाकून शुटींगला येतो," अशी कमेंट केली आणि त्यावरुनही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलं केलं आहे. नक्की पाहा >> सासूने रागात काढलेलं मास्क अन् शिल्ड मास्कमधून चुंबनाचा प्रयत्न; करोना ट्विस्टमुळे ‘ही’ मालिका झाली ट्रोल झालं असं की निशा सोनटक्के यांनी फेसबुकवर ‘अग्गंबाई सासूबाई’च्या कथानकावर उपहासात्मक टीका करणारी एक पोस्ट लिहिली. नजर काढताना वापरल्या जाणाऱ्या मिर्च्या आणि मीठ असणाऱ्या हातांचा फोटो पोस्ट करत, "आसावरी दृष्ट काढ तुझ्या बाळाची देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करतोय. तुझी पण मी दृष्ट काढते अरे काय लिहितात रे. शी रे नाही बघवत," असं म्हटलं होतं. या पोस्टवर कमेंट करत गिरीश ओक यांनी, "मधे लाॅकडाउनचा काळ जाऊनही अजून तशीच आतशबाजी सुरू आहे हे बघून बरं वाटलं," असं म्हटलं. त्यावर निशा यांनी, "कदाचित तुम्हाला राग येत असेल..पण माझी पोस्ट आलीच नाही तर,लगेच मला मेसेज चालू होतात निशाताई कुठे आहेस..खर तर केवढी जाहीरात आम्ही करतो. तुमच्या डायरेक्टर ना सांगा. आमच्या गँगला पार्टी हवी. परत पुरस्कार असतात तेव्हा आमच्या खुर्च्या राखीव हव्यात केवढी गँग जमवलीय बघा," असा मजेदार रिप्लाय गिरीश यांना दिला. मात्र गिरीश यांनी या कमेंटला उत्तर देताना, "निशा तुमचा वेळ मजेत जातोय नं? मग झालं तर वर पार्टी राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत काहीही (बुध्दीही) खर्च न करता वेळ मजेत जातोय तुमचा. तुमच्या या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय," असं म्हटलं. पुढे मात्र हा संवाद हलकापुलका न राहता थोडा गंभीर होत गेल्याचे निशा यांच्या कमेंटवरुन दिसून येतं. 'जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय', असं म्हणणाऱ्या गिरीश यांना उत्तर देतना निशा यांनी प्रेक्षकांना मालिका आवडली नाही की ते सांगणारच असं मत व्यक्त केलं. "अहो मस्करीत बोलते हो मला कुणाकडुनही कसलीही अपेक्षा नाही. माझे मित्रमंडळी पण अपेक्षा करणार नाहीत. प्रत्येकजण आपल्या उपजिविकेसाठी धडपडत आहे. कुणावर उपकार करून बाहेर पडत नाही. प्रेक्षकांना कथा आवडली नाही. बोलणारच की. राग कशाला हवा. मला वाटले काहीतरी बदल होतील. पण नाहीच. आमच्यासाठी घराबाहेर पडत असाल तर पडू नका लोकांना खरचं ही सिरियल आवडत नाही. लेखकांची अमूल्य बुध्दी वापरु नका," असा खोचक सल्ला निशा यांनी कमेंटमधून दिला. तुमच्यासाठी आम्ही जीव धोक्यात टाकून बाहेर निघतो म्हणणाऱ्या गिरीश यांना अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यावर व्यक्त होताना त्यांनी, "तुम्ही भंकस केलीत की आम्ही रागवायचं नाही आम्ही केली लगेच किती फणे निघाले. तेच मोजायचे होते मला," असं म्हटलं. तर पुढच्याच कमेंटमध्ये त्यांनी, "मी गेलं वर्षभर इथल्या पोस्ट वाचतोय आमच्या लोकांना सांगतोय माझंही इथे येणं रिॲक्ट करणं आवडायचं इथल्या लोकांना पण जरा मी तुमच्या सारखाच रिॲक्ट झाल्यावर सगळे एकत्र झाले मला वाळीत टाकलं एकाने तर माझं बिहेवियर पण काढलं असो. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला," असं म्हणतं चर्चेतून काढता पाय घेतला. या सर्व चर्चेचा पाच दिवसांहून अधिक काळा झाला असली तरी या कमेंटवर आजही अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.