‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेला नैतिक म्हणजेच अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. करणच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या असून करण पत्नी निशापासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मात्र आता या चर्चांवर स्वत: करणने मौन सोडलं आहे.

अभिनेता करण आणि निशा रावल गेल्या ९ वर्षांपोसून सोबत आहेत. २०१२ सालात त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांना एक ४ वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव काविश असं आहे. करण आणि निशा कामामध्ये व्यस्त असल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोलंल जात आहे. मात्र यावर आता करणने प्रतिक्रिया दिली आहे.

या चर्चांना पूर्ण विराम देत करण म्हणाला, ” नाही हे अगदी खोटं आहे. मी नुकताच पंजाबमध्ये शूटिंग करत होतो. मात्र आता मी मुंबईला परतलो असून सध्या क्वारंटाईन आहे. माझ्या सेटवर काही जणांना करोनाची लागण झाली होती. मी चाचणी केली जी निगेटिव्ह आली. मी घरातच आहे. दोन तीन चाचण्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी माझी तब्येत थोडी बिघडली आहे. म्हणून मी घरातच क्वारंटाईन झालोय. आमच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याच्या बातम्या कुठून येत आहेत माहित नाही. मात्र हे सर्व खोटं आहे.” असं म्हणत करणने सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

तर या चर्चांनंतर अनेक जण करणला आणि त्याची पत्नी निशाला फोन करत असल्याचं करण म्हणाला. पत्नी निशाने देखील यावर सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं आहे. या सर्व चर्चा खोट्या असल्याचं तिने स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांपासून करण पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असून निशा मुलासोबत मुंबईत आहे. आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत होत्या.

‘ये रिश्ता क्या कहलाता’ है या मालिकेमुळे करणला मोठी लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तो अक्षराच्या पतीची भूमिका साकारत होता. नैतिक या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. मालिकेनंतर करणने मात्र पंजाबी सिनेमांमध्ये काम करणं पसंत केलं.