‘चला हवा येऊ द्या’ हा शो गेली सहा वर्षे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे आणि घराघरात तो एक लोकप्रिय शो झाला आहे. आता या शोमध्ये अभिनेता स्वप्निल जोशीचा प्रवेश झाला आहे. सिंहासनावर विराजमान झालेल्या स्वप्निलच्या प्रवेशाने या शोची रंगत आणखी वाढली आहे. दिवाळीच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. यात थुकरटवाडीतील हे कलाकार एका भव्य वास्तूमध्ये वास्तव्याला आहेत. ही जागा आहे एका जुन्या राजाची, महाराजा प्रदीप सिंग ऊर्फ बच्चू जोशी यांची. ते ५०० वर्षांपूर्वीच निवर्तले आहेत, पण त्यांच्या या पवित्र आणि प्रिय वास्तूशी थुकरटवाडीचे लोक छेडछाड करतात आणि त्या रागातून राजाचा आत्मा तेथे अवतीर्ण होतो. या सर्व थुकरटवाडीकरांना बंदी बनवतो आणि राजाला हसवण्याची, त्याचे मनोरंजन करण्याची शिक्षा देतो. राजाने दिलेल्या शिक्षेमुळे आता हा धम्माल माहौल ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर रंगला आहे. यानिमित्ताने निर्मात्यांनी एक वेगळा प्रयोग या वेळी दिवाळीत केला होता. यातील कलाकार सात दिवस एका भव्य फार्महाऊसवर राहिले. तेथे त्यांनी धमाल केली आणि आता हीच धमाल प्रेक्षकांना शोमधून अनुभवायला मिळते आहे. राजाच्या भूमिके त असलेला स्वप्निलही या मनोरंजनाच्या गोंधळात सहभागी झाला आहे. याआधी एक कलाकार म्हणून अनेक चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने स्वप्निलने या शोमध्ये अनेकदा हजेरी लावली आहे. त्याला हा शो मनापासून आवडतो आणि तो आला की थुकरटवाडीतही एक माहौल निर्माण होतो. या नवीन प्रवेशामुळे तो आता या थुकरटवाडीचाच एक भाग झाला आहे. ‘चला हवा येऊ द्या’चा मंच माझ्यासाठी नवीन नाही. मी येथे अनेकदा आलो आहेच, पण त्याचबरोबर यातील कलाकारांशी माझा परिचय फार जुना आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे हे सर्व ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून पुढे आले आहेत, तर नीलेश साबळे त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होता. त्यांचा प्रवास मी तेव्हापासून अनुभवतोय. त्या सर्वाचा मी चाहता आहे. या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून मी त्यांचा मितवा म्हणून कार्यक्रमात सहभागी होतो आहे. त्यामुळे आता मला या आवडत्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होता येईल, समोर बसून त्यांचा आविष्कार पाहता येईल, कलाकारांना दाद देता येईल. या कलाकारांना कोपरखळी मारता येईल, त्यांची गंमत करता येईल, त्यांच्याकडून करून घेता येईल’, अशा शब्दांत स्वप्निलने आपला आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने पुन्हा चाहत्यांशी जोडले जाण्याचाही एक आगळा आनंद असल्याचेही त्याने सांगितले.