लीना भागवत, अभिनेत्री टाळेबंदीतील बंदिवासाबद्दल अभिनेत्री लीना भागवत सांगतात, १७ मार्चला चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर घरीच. टाळेबंदी, करोना वगैरे सगळेच आपल्याला नवीन असल्याने त्यानंतरचे आठ दिवस फक्त संभ्रमात गेले. त्याआधी नाटक, मालिका सलग सुरू असल्याने कामाचा काहीसा ताण आला होता, त्यामुळे कुठेतरी विश्रांतीची गरज होती. पण ती अशा स्वरूपात मिळेल अशी कल्पनाही केली नव्हती. सुरुवातीचे दहा दिवस सुट्टी मिळाल्यासारखे वाटले खरे, पण नंतर ही शांतता अनेक प्रश्न विचारू लागली. चिंता, भीती, जबाबदारी सगळे काही एकदमच अंगावर आले. घरात कामासाठी येणारे मदतनीस बंद झाले. मी स्वच्छतेच्या बाबतीत अगदी काटेकोर असल्याने घरकामात पुढाकार घेतला. वाचन मी कायमच करत असते आणि अभिनयापलीकडे मला कोणताही छंद फारसा जोपासता येत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये सततच्या विचाराने मी अंतर्मुख होत गेले. ‘जेव्हा जबाबदार नागरिक किंवा एखादा कलाकार मला भारतात राहू वाटत नाही असे विधान करतो तेव्हा आपण त्याच्यावर सडकून टीका करतो, पण आज इतकी माणसे आपल्या राज्यातून स्वत:च्या राज्यात परतू पाहत आहेत. अगदी कोणत्याही मार्गाचा अवलंब करत. तेव्हा प्रश्न पडतो की हे नेमके का घडत आहे?आज अनेक ठिकाणची गर्दी पाहून त्यांना सवाल करावासा वाटतो की तुमच्या बेफिकिरीमुळे इतरांचे नुकसान होते आहे ते कळत नाही का तुम्हाला?, ’ असे अनेक प्रश्न मनात फे र धरत असल्याचे त्या सांगतात. या टाळेबंदीच्या काळात कलाकार म्हणून एका प्रयोगात सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली आहे. त्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘आठशे खिडक्या नवशे दारं’ या नव्या मालिके त मी आणि मंगेश पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. टाळेबंदीच्या काळात घरात बसून अभिनय करायला मिळणे ही संकल्पनाच भन्नाट होताी, त्यामुळे अधिक उत्सुकता होती. आता जरा खऱ्या अर्थाने काम सुरू झाल्यासारखे वाटते आहे. सकाळी १० च्या आत आवराआवर, १० ते ६ चित्रीकरण, मग इतर तांत्रिक गोष्टी यामध्ये वेळ चटकन निघून जातो. मंगेश जरी अभिनय करत असले तरी त्यांच्यातील दिग्दर्शक सतत वर डोकावू पाहतो. एक सीन ते मला पाच वेळा वाचायला सांगतात. चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा म्हणजे, एकदा सकाळी साडेआठची शिफ्ट लावली. गच्चीत जाऊन आम्ही चित्रीकरण सुरू केले. ते संपायला तब्बल दीड वाजले. दीड वाजता जेवणाची वेळ झाली, पण जेवायला बसल्यावर लक्षात आले की, आज जेवण केलेच नाही. मग घाई घाईतच चहा—ब्रेडचा बेत उरकला आणि चित्रीकरणाला उभे राहिलो.’ ‘सेटवर आपण सहज स्पॉट दादांना पाणी मागतो, साडीच्या निऱ्या इकडच्या तिकडे झाल्या तरी आपण त्या ड्रेसरकडून नीट करून घेतो. पण या चित्रीकरणात आम्हीच आमचे स्पॉट दादा, मेकअपमन, ड्रेसर, कॅमेरामन असल्याने प्रत्येकाची किंमत कळते आहे’. घरातूनच या मालिके साठी काम करत असताना काही जाणिवा मनाभोवती अगदी घट्ट होत असल्याचेही त्या सांगतात. संकलन — नीलेश अडसूळ