छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय सिंगिग रियअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२’. हा शो टीव्हीवरचा सर्वात अधिक काळ चालणारा शो असून तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. बऱ्याच काळापासून हा शो स्क्रिप्टेड आहे, असे ट्रोलर्सचं म्हणणं आहे. ट्रोलर्सच्या या वक्तव्यावर ‘इंडियन आयडल १२’चा सूत्रसंचालक व गायक आदित्य नारायण आता सडेतोड उत्तर देताना दिसला आहे.

आदित्य नेहमीच शोच्या बाजूने बोलताना दिसला आहे. यापूर्वी देखील आदित्यने ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं. शो स्क्रिप्टेड असल्याचा दावा करणाऱ्या ट्रोलर्सना आदित्य नारायणने नुकतंच एका मुलाखतीत हे सडेतोड उत्तर दिले आहे. या मुलाखतीत बोलताना त्याने सांगितले की, “एकतर या ट्रोलर्सकडे बोलायला काहीच नसतं.म्हणून ते मनात येईल ते बोलतात, यावरून त्यांची विचारसरणी कळते. आजवर असा एक शो सांगा जो स्क्रिप्टेड नाही. प्रत्येक शोमध्ये थोडी फार स्क्रिप्ट ही असतेच आणि ती शोचा फ्लो ठरवण्यासाठी केली जाते.” यापुढे बोलताना आदित्य ट्रोलर्सना उद्देशून म्हणाला की “प्रेक्षकांची प्रतिक्रिया महत्वाची आहे. मात्र सगळ्यांनाच खुश ठेवणं शक्य नाही. आज या कठीण परिस्थतीत ‘इंडियन आयडल १२’ने अनेक लोकांना रोजगार दिला आहे आणि प्रेक्षकांना हा शो आवडतो म्हणून हा शो यशस्वी आहे.

यापुढे आदित्य म्हणाला की, “प्रत्येक गोष्टीच्या यशामागे भरपूर गोष्टींचा समावेश असतो . प्रत्येक माणसाची आपापली मतं असतात. सोशल मीडियामुळे आता लोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत . याआधी देखील ‘इंडियन आयडल’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.” प्रत्येक शो साठी प्रेक्षकांची मतं महत्त्वाची असतात असं देखील आदित्यने या मुलाखतीत स्पष्ट केलं. या शोमुळे आज हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. स्पॉट बॉय, मेकअप आर्टिस्ट यांची घरे या शो मुळे चालतात. या सगळ्या सकारत्मक गोष्टी घडत असल्याने आमचा शो आज यशस्वी झाला आहे, असं देखील आदित्य म्हणाला.

दरम्यान ‘इंडियन आयडल १२’चा महाअंतिम सोहळा जवळ आला आहे. सगळे स्पर्धक आणि परिक्षक जोरदार तयारी करताना दिसत आहेत. या शो च्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचचं लक्ष लागलेलं आहे. या सीजनची ट्रॉफी कोण जिंकणार आहे, यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.