बहिण-भावांची भांडणं प्रत्येक घरात होतात. टीव्हीच्या रिमोटपासून ते अगदी लहानमोठ्या गोष्टींमुळे ही भांडणं झाल्याचे आपण पाहतो. निर्माती एकता कपूर व तिचा भाऊ तुषार कपूर यांच्यातही लहानपणी एका गोष्टीवरून भांडण झालं. पण या भांडणानंतर एकताने थेट पोलिसांनाच फोन लावला होता. हा किस्सा खुद्द एकताने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला आहे.

‘लहानपणी मी आणि तुषार खूप भांडायचो. तुषार आणि मी कुटुंबीयांसोबत तिरुपतीला गेलो होतो. एका गोष्टीवरून आमचं भांडण झालं आणि तुषारने माझ्या नाकावर बुक्की मारली. भांडण नेमकं कशामुळे झालं हेसुद्धा मला आठवत नाहीये. पण त्यानंतर मी थेट पोलिसांना फोन लावला होता,’ असं एकताने सांगितलं.

एकताशी होणाऱ्या भांडणावर तुषार म्हणाला, ‘आम्ही शाळेत जात होतो तेव्हा आमच्यात खूप भांडणं व्हायची. अगदी एकमेकांना मारेपर्यंत वाद व्हायचे. शाळेत जाताना रस्त्यातच भांडण झालं की आम्ही एकमेकांची कॉलर पकडून मारण्याचा प्रयत्न करायचो. अशा वेळी पुन्हा घरी जाऊन कपडे बदलावे लागायचे आणि शाळेत पोहोचायला उशीर व्हायचा.’

एकता व तुषारने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये असे बरेच किस्से सांगितले. एकता सध्या तिच्या आगामी ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये कंगना रणौत व राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असून येत्या २६ जुलै तो प्रदर्शित होणार आहे.