‘ज्योती’ आणि ‘एक वीर की अरदास’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहाने तिच्या खासगी आयुष्यासंदर्भात बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. आठ महिन्यांतच दुसरं लग्न मोडल्याने आता लग्न ही गोष्टी माझ्यासाठी नाहीच आहे, असं ती म्हणते.

अवघ्या १९व्या वर्षी स्नेहाने अविष्कार दारव्हेकरशी लग्न केलं होतं. मात्र, घरगुती हिंसाचारामुळे हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर व्यावसायिक अनुराग सोलंकीसोबत स्नेहाने दुसरं लग्न केलं. वाढत्या मतभेदांमुळे आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटासाठी अद्याप अर्ज केला नसला तरी सध्या दोघे वेगवेगळे राहतात. याबाबत ती म्हणते की, ‘तो व्यक्ती चुकीचा आहे, असं मी म्हणणार नाही. पण, तो माझ्यासाठी योग्य जोडीदार नव्हता. घरगुती हिंसाचारामुळे माझं पहिलं लग्न टिकलं नाही. आता दुसऱ्यांदा पतीपासून विभक्त झाल्यावर मला हे कळतंय की, पुरुषांना त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावशाली किंवा हट्टी महिला आवडत नाहीत. लग्न ही गोष्टच माझ्यासाठी नाही, असं मला प्रकर्षाने वाटू लागलंय.’

https://www.instagram.com/p/Bai1cJRheHt/

https://www.instagram.com/p/BZlIFL3BHHG/

या कठीण काळात कुटुंबीयांनी फार मोठा आधार दिल्याचं ती सांगते. फक्त पुरुषांमुळेच कुटुंबाचा गाडा चालतो, अशी संकल्पना आपल्या समाजात आहे. पण, हे खरं नाही. मला स्वत:वर विश्वास आहे आणि माझ्या कुटुंबाचा सांभाळ करण्यास मी समर्थ आहे, असं ती ठामपणे सांगते.