छोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी -९’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो सध्या एका रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमाचा फिनाले काही दिवसांवरच येऊन ठेपला असताना ऐनवेळी या शोमधून विकास गुप्ताला बाहेर पडावं लागलं होतं. विकासच्या बाहेर पडण्यानंतर आता हर्ष लिंबाचिया हा देखील शोमधून बाहेर पडला आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, ‘खतरों के खिलाडी’ हा साहसदृश्यांनी परिपूर्ण असा कार्यक्रम असून यात स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देण्यात येत असतात. सध्या या शोच्या ९ व्या पर्वाचं चित्रीकरण अर्जेंटीनामध्ये सुरु असून विकासनंतर नुकताच हर्ष बाहेर पडला आहे. अंतिम फेरीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यास हर्ष असमर्थ ठरल्यामुळे त्याला हा शो सोडावा लागला आहे.

विकास आणि हर्ष या दोघांकडेही विजेतापदाचा दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे विकासला हा शो सोडावा लागला तर हर्षला शोमध्ये टिकणं अशक्य झालं. मात्र हे दोघं जरी शोमधून बाहेर पडले असले तरी भारती सिंहकडे विजेतीपदाची दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. सध्या या शोमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्रीच्या माध्यमातून दोन स्पर्धकांचा प्रवेश होणार असून एली आणि आदित्य नारायण पुन्हा या शोमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.