बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटली असली तरी चाहते ते आज तितक्याच आनंदाने पाहातात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असणारा ‘कुछ कुछ होता है.’ हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करण जोहरच्या या चित्रपटातील तिनही पात्रे विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहिती आहे का ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला विचारले होते. पण ऐश्वर्याने त्या भूमिकेसाठी नकार दिला होता.

‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आनंदाने पाहातात. या चित्रपटातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. चित्रपटात टीना हे पात्र राणी मुखर्जीने साकारले होते. तिला या चित्रपटाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. पण तुम्हाला माहिती आहे का करण जोहरने सुरुवातीला राणी मुखर्जी ऐवजी ऐश्वर्याची निवड केली होती. टीना या पात्रासाठी ऐश्वर्या राय ही निर्मात्यांची पहिली पसंती होती.

आणखी वाचा : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधला वाद मिटला, पुन्हा शोमध्ये दिसणार एकत्र?

मात्र, ऐश्वर्याने या भूमिकेसाठी नकार दिला. ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर ऐश्वर्याने चित्रपटासाठी तिला ऑफर देण्यात आली होती आणि तिने ती नकारली असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी ऐश्वर्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. तिने केवळ तीन चित्रपट केले होते. त्यामुळे कुठला चित्रपट करावा आणि कुठला नाही याबाबत ती गोंधळली होती. त्यामुळे तिने चित्रपटाला नकार दिल्याचे म्हटले जात होते.