नुकताच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील एक प्रश्न असा होता की तो त्याच्या मुलांना कोणता चित्रपट दाखवणार नाही. त्यावर अक्षयने सांगितले सांगितले की मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांना माझा ‘गरम मसाला’ हा चित्रपट पाहू नका असे सांगेल.

‘मी माझा एखादा चित्रपट जो माझ्या मुलांना दाखवू इच्छीत नाही तो म्हणजे गरम मसाला. कारण त्या चित्रपटामध्ये मी एकाच वेळी चार मुलींना डेट करत आहे. मी माझ्या मुलांना असे सांगेन की, ‘बेटा आता ती वेळ गेली, आता ते विसरा. आजकालच्या मुलींकडे मेकअपच्या सामानापेक्षा ट्रॅकिंगचे सामान जास्त असते. त्या तुम्हाला सहजतेने ट्रॅक करु शकतात म्हणून आता अशा गोष्टी विसरा’ असे अक्षय कुमार म्हणाला.

गरम मसाला चित्रपटात अक्षय कुमारने मकरंद नावाच्या फोटोग्राफरची भूमिका साकारली आहे. हा मकरंद उर्फ मॅक एकाच वेळी चार मुलींना डेट करत असतो. तसेच त्या चौघींनाही मॅक एकमेकींबद्दल कळू देत नाही. परंतु त्या चौघींनाही एकाचवेळी सांभाळताना मॅकला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि शेवटी अक्षय या गुंतागुंतीमध्ये अडकतो.

सध्या अक्षय कुमार रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे. तसेच या चित्रपटात अक्षयसह कतरिना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षय आणि कतरिना तब्बल ९ वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. अक्षय आणि कतरिना हे २०१०मध्ये फराह खानच्या ‘टीस मार खान’ या चित्रपटात काम केले होते.