अभिनेता अक्षय कुमारने त्याची बहीण अलका भाटिया व तिच्या मुलांना मुंबईहून दिल्लीला पोहोचवण्यासाठी संपूर्ण विमानाची बुकींग केल्याची चर्चा होती. मात्र हे पूर्णपणे खोटं असल्याचं अक्षयने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत हे खोटं वृत्त देणाऱ्यांवर तो भडकला आहे. ट्विटरच्या माधम्यातून स्पष्टीकरण देत अक्षयने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली. विमानसेवा सुरू होताच अक्षय कुमारने बहीण व तिच्या दोन मुलांसाठी संपूर्ण विमान बुक केल्याचं हे वृत्त होतं. बहिणीला मुंबईहून दिल्लीला पाठवण्यासाठी अक्षयने ही व्यवस्था केल्याचं म्हटलं गेलं होतं.

यावर अक्षयने ट्विट केलं, ‘माझी बहीण व तिच्या दोन मुलांसाठी मी विमान बूक केल्याचं हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून तिने कुठलाच प्रवास केला नाही आणि तिला दोन नाही तर एकच मूल आहे. चुकीचे अहवाल देऊन अशा पद्धतीने खोटं वृत्त देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार करतोय.’