देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम रंगला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार विविध पक्षांकडून आपले नशीब आजमावत आहेत. सोमवारी सकाळी अक्षय कुमारने एक ट्विट केल्यामुळे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबत देशभरात चर्चा सुरू होती. मात्र, अक्षय कुमारने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करत चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

‘काही तासांपूर्वी मी केलेल्या ट्विटला प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार. परंतु या ट्विटमुळे कोणताही गैरसमज नसावा म्हणून मी स्पष्ट करु इच्छितो की मी ही निवडणूक लढवणार नाही’ असे अक्षय कुमारने ट्विट केले आहे.

याआधी अक्षयने ‘आज एका नव्या आणि अपरिचित क्षेत्रात पाऊल टाकत आहे. याआधी मी अशा क्षेत्रात कधीच पदार्पण केले नव्हते. त्यामुळे या नव्या क्षेत्राविषयी प्रचंड कुतूहल आणि तितकीच धाकधूकही आहे. नव्या बदलासाठी तयार रहा’ असे म्हणत अक्षयने हे ट्विट केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अक्षय नक्की काय करणार असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. नुकताच अक्षयने या ट्विटचा खुलासा केला आहे.

अभिनेता अक्षय कुमार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच चित्रपटात अक्षयसह कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय आणि कतरिना ही जोडी तब्बल ९ वर्षानंतर एकत्र दिसणार आहे.