बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सतत कोणता ना कोणता कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मस्तीमध्ये केलेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेटवरील काहीजण या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि व्हिडीओअखेर अक्षय व रोहित जमिनीवर लोळत ‘हमे लडना पडेगा’ असे म्हणतात. या व्हिडीओने सोशल मीडियावर धूमाकुळ घातला होता.

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘गूड न्यूज’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान त्याने व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल वक्तव्य केले. ‘अशा प्रकारच्या अफवांमुळे अनेकांच्या नात्यात कटूता निर्माण होते. खासकरुन जेव्हा दोन अभिनेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. एखाद्या चित्रपटात अभिनेत्याला रिप्लेस केले आहे अशा अफवा सुरु असताना. तेव्हा त्या दोन कलाकारांच्या नात्यावर त्याचा परिणाम होतो. काही दिवसांपूर्वी मी कपूर्स आणि खान यांच्या व्यवसायाला टफ फाइट दिली असे म्हटले जात होते. पण या सगळ्या अफवा होत्या’ असे अक्षय म्हणाला.

‘संपूर्ण चित्रपटसृष्टी एक कुटुंब आहे आणि मीडियादेखील या कुटुंबाचा भाग आहेत. तसेच कपूर, खान्स आणि कुमार हे सर्वचजण एकत्र राहतात. बऱ्याच वेळा कलाकार एकमेकांना डेट करत आहेत किंवा त्यांच्यात भांडणे झाल्याच्या चर्चा सुरु असतात. पण याच चर्चांमुळे मी अनेकांच्या संसारात भांडणे झाल्याचे पाहिले आहे’ असे अक्षय पुढे म्हणाला.