चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्यांच्या अॅक्शनपटांसाठी ओळखले जातात. ‘सिम्बा’, ‘सिंघम’,’गोलमाल’ या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा ‘सुर्यवंशी’ या आगामी चित्रपटाकडे वळविला आहे. या चित्रपटामध्येही मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला असून ‘खिलाडी कुमार’ अर्थात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र चित्रीकरण सुरु असतानाच अक्षयने अचानक दोन दिवसांसाठी ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. अक्षयने घेतलेल्या ब्रेकमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र त्याच्या ब्रेक घेण्यामागचं कारण आता समोर आलं आहे.

यंदाचं वर्ष अक्षयसाठी खास असून एकाच वेळी तो विविध प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. ‘सुर्यवंशी’प्रमाणेच तो ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटामध्येही झळकणार आहे. त्यामुळेच त्याला या दोन्ही चित्रपटांना वेळ देणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांच्या डेट्स सांभाळत तो त्याचं चित्रीकरण पूर्ण करत आहे. ‘सुर्यवंशी’चं चित्रीकरण सुरु असताना त्याला ‘हाऊसफुल ४’साठी थोडासा वेळ काढावा लागला. ‘हाऊसफुल ४’ मधील एका गाण्याचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी अक्षयला ‘सुर्यवंशी’मधून २ दिवसांचा ब्रेक घ्यावा लागला आहे.

‘हाऊसफुल ४’मधील या गाण्याचं चित्रीकरण मुंबईतील सिटी स्टुडिओ येथे चित्रीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यामध्ये अक्षयसोबत नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील झळकणार आहे. हे गाणं प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केलं आहे.