चित्रपटाच्या प्रसारासाठी ‘चला हवा येऊ द्या’ला बगल कोल्हापूरच्या लाल मातीतली राणा आणि अंजलीची कथा प्रेक्षकांच्या मनात सध्या चांगली घर करते आहे. ‘झी मराठी’वरच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणा आणि अंजलीच्या प्रेमकथेचा ट्रॅक सुरू असल्याने सध्या टीआरपीच्या तक्त्यावरही या जोडीने पहिला क्रमांक मिळवला आहे. ही माहिती सध्या ‘जॉली एलएलबी २’च्या प्रसिद्धीत गुंतलेल्या अक्षय कुमारच्या कानावर गेली. याआधी ‘रुस्तूम’साठी अक्षयने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावली होती. हिंदी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी ‘चला हवा येऊ द्या’ची हवा आवश्यक आहे हे हिंदीतील बडे निर्माते-कलाकारांच्या लक्षात आले आहे. मात्र अक्षयने इतरांपेक्षा वेगळा विचार करत राणाच्या प्रेमकथेत हजेरी लावायचा निर्णय घेतला आहे.‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित चित्रपटाच्या त्याच नावाने येणाऱ्या सिक्वलमध्ये अक्षय कुमार जॉलीच्या म्हणजेच जगदीश्वर मिश्राच्या मुख्य भूमिकेत आहे. याआधीच्या चित्रपटात जॉलीची भूमिका अभिनेता अर्शद वारसीने केली होती. मात्र सिक्वलमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. या चित्रपटाची चर्चा मराठीमध्ये होणे ही हिंदीवाल्यांसाठी आवश्यक बाब ठरू लागली असल्याने आपल्या चित्रपटासाठी अक्षय कुमार पुन्हा मराठीकडे वळला आहे. मात्र यावेळी त्याने ‘चला हवा येऊ द्या’ ऐवजी सध्या नंबर वन असलेल्या ‘तुझ्यात जीव गुंतला’ या मालिकेची निवड केली आहे. आता लखनौमधला जगदीश्वर मिश्रा आणि कोल्हापूरचा राणा यांची भेट होणार कशी? हा या कथेचा गमतीचा भाग ठरणार आहे. सध्या तरी पाठकबाईंपर्यंत आपले प्रेम कसे पोहोचवायचे याच्या चिंतेत असलेल्या राणाला जॉली म्हणजेच अक्षय कुमार प्रेमाचा सल्ला देणार आहे. त्यासाठी पेशाने वकील असलेला जॉली आपल्या गिऱ्हाईकाच्या शोधात कोल्हापूरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचलेला पाहायला मिळणार आहे. नेमक्या याच हॉटेलमध्ये राणा आणि पाठकबाई म्हणजेच अंजलीला घेऊन तिचा मित्र कल्पेश आला आहे. प्रसिद्धीसाठी का होईना जॉली आणि राणाची ही भेट प्रेक्षकांसाठी गमतीची ठरणार आहे.