अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'टॉयलेट : एक प्रेम कथा' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर आधारित या चित्रपटावर दिग्दर्शक प्रवीण व्यास यांनी कॉपीराइटच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. प्रवीण व्यास यांनी स्वच्छ भारत अभियानावर २०१६ मध्ये 'मानिनी' हा माहितीपट तयार केला होता. या माहितीपटाला मागील वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (गोवा) तिसरा पुरस्कारही मिळाला होता. आपल्या माहितीपटातील काही दृश्य आणि संवाद जसेच्या तसे 'टॉयलेट: एक प्रेम कथा' चित्रपटात वापरल्याचा आरोप प्रवीण यांनी निर्माते वायकॉम १८ वर लावला आहे. त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशन आणि ट्रेलरविरोधात कायदेशीर नोटीसदेखील पाठवली आहे. या प्रकरणाबद्दल प्रवीण व्यास म्हणाले की, 'मानिनी एका महिलेवर आधारित आहे जी आपल्या सासरी शौचालय नसल्याचा विरोध करते. मानिनीला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पहाटे उठवून शेतात शौचालयाला जायला सांगितलं जातं. टॉयलेट: एक प्रेम कथा चित्रपटाच्या ट्रेलरमधील भूमिकांमध्येही असाच संवाद दाखवला गेला आहे.' वाचा : सारावर का आली तोंड लपवण्याची वेळ? IFFI मध्ये पुरस्कार जिंकल्यानंतर 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या अधिकृत वेबसाइटवर 'मानिनी' हा माहितीपट अपलोड करण्यात आलेला आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीदेखील याचा सन्मान केला होता. 'मानिनी'चे पटकथा लेखक शंकर अर्निमेशसुद्धा ट्रेलर पाहून आश्चर्यचकित झाल्याचेही व्यास यांनी सांगितले. दिल्लीतील वकिलांच्या मदतीने त्यांनी १५ जून रोजी कॉपीराइट उल्लंघनाचे प्रकरण सांगत एक कायदेशीर नोटीस पाठवली असून चित्रपटावर स्थगिती आणण्याची विनंती केली आहे. दुसऱ्या बाजूस 'टॉयलेट: एक प्रेम कथा'च्या निर्मात्यांनी २८ जून रोजी उत्तर पाठवले आहे. वायकॉम १८ ने व्यास यांचे सर्व आरोप फेटाळत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.