बॉलिवूडची ‘क्यूट गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट ‘कलंक’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच आलिया पुन्हा एकदा रणवीर सिंग सह चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता आलियाने या बाबत खुलासा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदाच ‘गली बॉय’ चित्रपटात एकत्र पाहायला मिळाली होती. रणवीर आणि आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांची मनं देखील जिंकली होती. आता ही जोडी पुन्हा ‘तख्त’ चित्रपटात झळकणार आहे. ‘तख्त’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करणार असून रणवीर आणि आलियाचा हा दुसरा एकत्र चित्रपट असणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलिया सह अनिल कपूर, जान्हवी कपूर, करिना कपूर, भूमि पेडणेकर आणि विकी कौशल ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

आता आलिया आणि रणवीर तिसऱ्यांदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यावर आलियाने, ‘मला अजून अशी कोणतीच ऑफर आलेली नाही पण ती मला मिळेल अशी मी आशा बाळगते’ असे सांगितले. तसेच आलियाने रणवीर सह एक वेगळेच नाते तयार झाले असल्याचे सांगितले. ‘आम्हा दोघांनाही एकमेकांसह एकत्र काम करण्याची फार उत्सुकता होती. मला मनापासून रणवीर आवडतो. तसेच आमच्या दोघांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य देखील आहे’ असे आलिया पुढे म्हणाली.

सध्या आलियाकडे पाच मोठे चित्रपट आहेत. त्यामधील ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया व्यग्र आहे. तिचा हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर आलिया करण जोहरच्या ‘तख्य’, महेश भट्ट यांच्या ‘सडक २’, आयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि राजामौलींच्या ‘RRR’मध्ये झळकणार आहे.