बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार, अशी चर्चा आजवर अनेकदा आपण ऐकली आहे. आता या चर्चेवर स्वत: आलिया भट्टने खुलासा केला आहे.

काय म्हणाली आलिया?

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियाला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर आलिया म्हणाली, “माझ्या लग्नाच्या बातम्या मी अनेकदा ऐकल्या आहेत. दर दुसऱ्या आठवड्यात या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण त्यातून माझं केवळ मनोरंजन होत आहे. रणबीर चांगला मुलगा आहे, पण मी जेव्हा लग्न करेन तेव्हा सगळ्याना सांगूनच करेन.” असे म्हणत आलियाने रणबीरसोबतच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली.

गेल्या वर्षी आलिया आणि रणबीरच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. व्हायरल होणाऱ्या या पत्रिकेवर लग्नाची तारीख २२ जानेवारी २०२० अशी लिहिण्यात आलेली होती. त्यानंतर ही पत्रिका खोटी असल्याची माहिती समोर आली. परंतु आलियाने या पत्रिकेवर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आता मी काय बोलू असं म्हणत तिने विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता.