बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सातत्यानं या चित्रपटाला विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाचे लेखक यांना मुंबईतील माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.

मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. ही याचिका गंगूबाई काठियावाडी यांच्या मुलाने केली आहे. बाबू रावजी शाह असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. गंगूबाई काठियावाडी यांनी दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक असल्याचा दावा बाबूने केला आहे. या चित्रपटात तथ्यहीन गोष्टी दाखवण्याता आल्या आहेत. या चित्रपटामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचं त्याने या याचिकेत म्हटले आहे. मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत आहे. हुसैन जैदी यांचे हे पुस्तक आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचसोबत अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.