बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या 'गोलमाल अगेन' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत असताना तिने 'नवभारत टाइम्स डॉट कॉम'शी संवाद साधला. यावेळी तिने फक्त सिनेमांबद्दलच नाही तर खासगी गोष्टींवरही भाष्य केले. सकाळी ११ वाजल्या पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सतत सिनेमाचे प्रमोशन केल्यामुळे ती फार दमली होती. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी सकाळपासून एकाच पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन थकले. आता मला परत त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याची अजिबात इच्छा नाही. पण सिनेमाचे प्रदर्शन जवळ येतंय त्यामुळे मुलाखती तर द्याव्याच लागतात. थकलेल्या तब्बूने सुरूवातीला काही प्रश्नांची उत्तरे दिली आणि नंतर स्वतःच पुढील प्रश्न काय येणार हेही सांगू लागली. 'मला सगळ्यांनी याच पद्धतीचे प्रश्न विचारले. आता तुम्ही मला माझ्या लग्नाबद्दल विचाराल. मला आता असे वाटू लागले आहे की, सलमान आणि माझ्या लग्नाबद्दलच अनेकांना चिंता आहे. लग्नाबद्दलचे प्रश्न ऐकून मला आता कंटाळा आला आहे. काही तरी वेगळे प्रश्न विचारा.' सिनेमातील आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना ती म्हणाली की 'हा एक विनोदीपट आहे. लोकांना हसवणं हे खरंच फार कठीण आहे. माझ्यासाठी हे सोपं होतं कारण मी वेगळं काही तरी केले आहे. यातील प्रत्येक कलाकाराला त्यांची व्यक्तिरेखा पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळे मला या सिनेमात काम करणं सोप्प गेलं.' 'गोलमाल अगेन' ही हॉरर कॉमेडी असेल. आयुष्यात कधी भूतांशी सामना झाला का, या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, ''गोलमाल' टीममध्ये मुलांचा जो ग्रुप होता तो भूतांपेक्षा कमी नव्हता. ही फार मस्तीखोर लोकांची टीम आहे. ते कोणत्या थरापर्यंत जाऊन मस्करी करू शकतात, हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते मला आता त्रास देऊ शकत नाहीत. सेटवर कोणताही नवीन माणूस आला की हे सर्वजण मिळून त्याची खूप मस्करी करायचे.'