‘अमर अकबर अँथनी’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर या त्रिमूर्तीने आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट गाजवला होता. या चित्रपटाला आज तब्बल ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बिग बींनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी या चित्रपटाची तुलना ‘बाहुबली’ या ब्लॉगबस्टर चित्रपटाशी केली आहे.

“४३ वर्षांपूर्वी ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटाने सात कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. सध्याच्या महागाईचा विचार करता हा आकडा ‘बाहुबली २: द कॉन्क्लूज़न’ या चित्रपटाने केलेल्या कमाई पेक्षा मोठा आहे.” अशा आशयचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘बाहुबली २: द कॉन्क्लूज़न’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने जवळपास एक हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी काम केले आहे.