बॉलिवूडमध्ये गाजलेला 'कुली' हा चित्रपट साऱ्यांनाच आठवत असेल ना ? या चित्रपटामध्ये केवळ अमिताभ बच्चन यांचा अभिनयच गाजला नाही तर चित्रीकरणावेळी त्यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती. इतकंच नाही तर अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी नवस देखील केले होते. या दिवसाची आज बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा आठवण करुन दिली आहे. आजच्याच दिवशीच हा अपघात झाल्यामुळे त्यांनी माझा पुनर्जन्म झाल्याचं म्हटलं आहे. जुलै १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटातील एक साहस दृश्य करताना अभिनेता अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर बंगळुरुमध्ये उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात हलवण्यात आलं होतं. ही आठवण ताजी करत बिग बी यांनी ट्विट केलं आहे. T 2885 - To them that have sent greetings for my 2nd birthday Aug 2, a recovery from my Coolie accident, I send my gracious thanks .. it shall be difficult for me to acknowledge and thank all .. but I do know that it was your prayers that saved my life .. — Amitabh Bachchan (@SrBachchan) August 1, 2018 '३६ वर्षांपूर्वी याच दिवशी 'कुली' चित्रपटाच्या सेटवर माझा अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न आणि चाहत्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे मी आजचा दिवस पाहत आहे. तो आजचाच दिवस होता २ ऑगस्ट ज्या दिवशी मला पुनर्जन्म मिळाला आणि हे सारं तुमच्या प्रार्थनेमुळेच शक्य झालं', असं ट्विट बिग बी यांनी केलं. दरम्यान, चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना गंभीर दुखापत झालेल्या बिग बींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आणाव लागलं होतं. मात्र त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे अमिताभ यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. बंगळुरुमधील रुग्णालयातून मुंबईत आलेल्या बिग बींना ब्रीच कँडीमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. मात्र मुसळधार पावसामुळे एकही रुग्णवाहिका त्यांना नेण्यास तयार नव्हती. या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. त्यामुळेच अमिताभ यांच्यावर उपचार होऊ शकले, असं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा टिझरच्या वेळी सांगितलं होतं.