बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि त्यांच्या कित्येक गोष्टी ते ट्विट करून लोकांसोबत शेअर करत असतात. याशिवाय ते दररोज ब्लॉग सुद्धा लिहितात आणि त्यांच्या मनातल्या व्यथा लोकांसोबत शेअर करत असतात. नुकतंच बिग बींनी त्यांच्या घरात बदल केल्यामुळे मोठ्या मनस्तापाला समोरं जावं लागलंय. मनातली हीच व्यथा अमिताभ बच्चन यांनी नुकतंच एका ब्लॉगमधून लोकांसोबत शेअर केलीय.

काही दिवसांपुर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बंगल्याचं रेनोवेशन केलं होतं. यात त्यांचे वडिल हर‍िवंश राय बच्चन यांनी स्वतः लिहिलेल्या काही कविता मिळत नसल्यानं बिग बीं भडकले आहेत. बिग बींचे वडिल हर‍िवंश राय बच्चन हे महान हिंदी कव‍ी होते. त्यांनी लिहिलेल्या ‘मधुशाला’ कविता आज ही अव्वल दर्जाच्या कव‍िता मानल्या जातात. त्यांची आठवण म्हणून बिग बींनी या कविता घरात जपून ठेवल्या होत्या. पण आता या कविता त्यांना घरात सापडत नाहीत. यामुळे नाराज होऊन बिग बींनी एक ब्लॉग लिहून आपला राग व्यक्त केलाय.

या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, “वडिलांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये कित्येक कवितांचे संदर्भ दिले आहेत. वडिलांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या त्या कविता आता मी शोधतोय तर सध्या कुठेच सापडत नाहीयेत…गेल्या काही दिवसात घरात काही बदल केले होते, त्यामुळे आता वडिलांनी लिहिलेल्या कविता सापडत नाहीत, याचा विचार करून खूप राग येतोय…हा निव्वळ निष्काळजीपणा आहे…”

यापुढे लिहिताना बिग बी म्हणाले, “मी थोडी सुद्धा कल्पना नव्हती की घरात केलेल्या बदलांमुळे इतका मनस्ताप होईल…तुम्ही एखादी वस्तू जपून एका ठिकाणी ठेवता आणि जेव्हा तुम्ही ती शोधायला जाता तेव्हा ती सापडत नाही किंवा मग तुम्ही विसरता.”

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच गेम शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ मधून टीव्हीवर परतणार आहे. याशिवाय ते ‘गुड बाय’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘मेडे’ चित्रपटातून झळकणार आहेत.