बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. स्वच्छतेच्या कामात मदत व्हावी म्हणून त्यांनी पर्यावरणवादी अफरोज शाहला ट्रॅक्टर आणि खोदकाम करणारे यंत्र भेट दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत बिग बींनी हे पाऊल उचलले. अफरोज शाहसोबतच वर्सोवा समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छता मोहिमेत भाग घेणाऱ्या लोकांचीही त्यांनी तेथे भेट घेतली. बिग बींनी ट्विटरवरून हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ‘आयुष्यातील हा अत्यंत समाधानकारक अनुभव होता,’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले.

अफरोज शाहने २०१५ मध्ये या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेची मोहिम सुरु केली. अनेकांच्या सहभागाने नंतर याचे एका अभियानात रुपांतर झाले. बऱ्याच सेलिब्रिटींनीही यात हातभार लावला. रणदीप हुडा, अनुष्का शर्मा आणि दिया मिर्झा यांनीही यापूर्वी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता.