काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामान्य जनतेने आणि चित्रपटसृष्टीतील सहका-यांनी पुढे यावे, असे आवाहन चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले आहे. काश्मीरमधील पूराच्या तडाख्याने विस्थापीत झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
काश्मिरी जनतेच्या मदतीसाठी १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘हम हैं उमीद-ए-काश्मिर’ कार्यक्रमात ‘मेट फिल्म गिल्ड’ आणि अन्य सदस्य सामील होणार आहेत. क्लेशकारी आणि वेदनादायी जीवन जगत असलेल्या काश्मिरी बंधु-भगिनींसाठी चित्रपटसृष्टीने योगदान द्यावे…! मी देणार आहे… तुम्हीसुध्दा द्या!, असे अमिताभ यांनी आपल्या टि्वटरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हृतिक रोशन, शाहिद कपूर, श्रध्दा कपूर आणि कुणाल कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकार काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.