पुढच्या दोन महिन्यांमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’चे नववे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवव्या पर्वाचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करणार नाहीयेत हे जवळपास पक्क झालं आहे. बिग बींशिवाय आता या नवीन पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हा मोठा प्रश्न चॅनलसमोर उभा होता. अनेक कलाकारांच्या नावात रणबीर कपूरचे नाव सध्या अग्रणी आहे. पण तरीही एखाद्या अभिनेत्रीला घेऊन नववे पर्व सुरू करावे अशी संकल्पना शोच्या निर्मात्यांची आहे.

एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या शोचं स्वरूप पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. या शोचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन यांच्याऐवजी आता एखादी अभिनेत्री करेल अशी चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत आहे. शोच्या निर्मात्यांनी माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्याशी या शोचे सुत्रसंचालन करण्यासंदर्भात बोलणीही सुरू केली आहेत. पण अजून कोणीही होकार कळवला नाहीये.

https://www.instagram.com/p/BQPJiLYg5rE/

शोच्या निर्मात्यांनी आता अभिनेत्री सुत्रसंचालन करणार म्हणून शोमध्ये अनेक बदल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. आतापर्यंत ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठ सीझनपैकी एकाही सीझनचे सुत्रसंचालन कोणत्याही अभिनेत्रीने केले नव्हते. त्यामुळे हा सीझन प्रेक्षकांसाठी खूप काही नवीन देणारा असेल असे म्हणायला हरकत नाही.