माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा कायमच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे प्रत्येक पर्व हिट ठरले आहे. सध्या केबीसी १२ प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करत आहे. पण आता अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रिटायरमेंटचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीमधून रिटायर होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून मनातील अनेक गोष्टी सर्वांसमोर मांडताना दिसतात. नुकताच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी रिटायरमेंटचा उल्लेख केला आहे. ‘मी आता थकलो आहे आणि रिटायर झालो आहे… मी सर्वांची माफी मागतो… कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण खूपच लांबले… कदाचित उद्या पुन्हा चांगले करु शकेन पण लक्षात ठेवा काम हे काम असते आणि ते पूर्ण मन लावून करायला हवे’ असे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

पुढे ते म्हणाले, ‘शुटींगच्या शेवटच्या दिवशी खूप सारं प्रेम मिळालं… पण शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. इच्छा तर कुठेही न थांबण्याची आहे पण थांबावे लागेल.. मी आशा करतो की हे सगळं पुन्हा होईल. सेटवरील क्रू आणि टीममेंबर्स खूप मेहनती आहेत. या आशा गोष्टी आहेत ज्या सेटवर काम करण्यास तुम्हाला प्रोत्साहन देतात. सेटवर सगळ्यांनी माझी काळजी घेतली आहे. गेले अनेक दिवस आपण एकत्र काम करत आहोत.. ते क्षण माझ्या कायम आठवणीमध्ये राहतील. तुम्हा सर्वांचे आभार.’

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून आजपासून होणार बंद, पण…

अमिताभ यांचा ब्लॉग वाचल्यावर अनेकांना कौन बनेगा करोडपती १२ हा अमिताभ यांच्या सूत्रसंचालनाचा अखेरचा सीझन तर नाही ना? असा प्रश्न पडला आहे. अमिताभ यांना आणखी सीझनचे सूत्रसंचालन करताना पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.