मराठा सेवा संघाच्या वतीने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार कोल्हे यांना प्रदान करण्यात आला. मालिकेच्या संपूर्ण टीमच्या वतीने हा पुरस्कार स्विकारत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनी मालिकेच्या सेटवरील एक विशेष गोष्टही उपस्थितांबरोबर शेअर केली. ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्काराचे श्रेय कोल्हे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या संपूर्ण टीमला दिले. हा पुरस्कार स्वीकारणारा मी फक्त मुखवटा असल्याचं कोल्हे यावेळी म्हणाले. कोल्हे यांनी मालिकेच्या सेटवर आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिलेल्या संस्कारांचे पालन करतो असं सांगितले. ''बाळासाहेब एकदा म्हणाले होते, 'जात जन्मानीशीच पाठीला चिकटून येते. ती पोटाला कधी चिटकवू नका.' यालाच अनुसरून आम्ही आमच्या सेटवरील कोणालाच अडनावाने हाक मारत नाही'', असं अमोल कोल्हे यांनी सांगितले. 'या ठिकाणी माझी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची संपूर्ण टीम आहे. या संपूर्ण टीमध्ये १८ पगड जातीची माणसं आहेत. मालिकेसाठी १८ पगड जातीची माणसं एक झालीत. पण या टीमधील सदस्य कोणत्या जातीजमातीचा माणूस आहे हे आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही एकमेकांना आडनावाने हाक मारतच नाही. आम्ही एकमेकांना फक्त नावानं हाक मारतो. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेला संस्कार आज आम्ही जपतो. खरं तर हा संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ मासाहेबांनी रुजवला आहे. हा संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवला आहे. म्हणून या माझ्या संपू्र्ण टीमच्या वतीनं, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे जे प्रसारक आहेत त्या झी मराठीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतो. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे जर वडिलांनी लेकराला खांद्यावर उचलून घेतलं तर लेकराची उंची वाढते या न्यायानं महाराष्ट्रातल्या तमाम शिव-शंभू भक्तांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिका उचलून धरली म्हणून ती लोकप्रिय होतेय. यासाठी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो.' असं कोल्हे यांनी सांगितले. तसेच या भाषणामध्ये या पुस्काराला जातीचं बंधन नसल्याबद्दल कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला. 'मला महत्वाची गोष्ट हिचं वाटते की कोणत्या जातीत जन्माला यावं, कोणत्या धर्मात जन्माला यावं, कोणत्या पंथात जन्माला यावं, कोणत्या प्रांतात जन्माला यावं हे माझ्या हातात कधीच नसतं. त्यामुळे दोन पर्याय आपल्यासमोर असतात. पहिला पर्याय - अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं. दुसरा पर्याय मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्माला आलात तरी आपल्या कर्तुत्वानं आपलं व्यक्तिमत्व उंचीवर नेऊन ठेवावे असं मत कोल्हे यांनी व्यक्त केले. तुमच्या कर्तुत्वाचा तुमच्या जातीला, पंथाला, प्रांताला आणि राष्ट्रालाही अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे वरील दोन पर्यायांपैकी दुसरा पर्याय निवडा असा सल्ला कोल्हेंनी उपस्थितांना दिला. अमोल कोल्हे यांच्या सिंदखेडमधील भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.