सध्या बॉलिवूडमधील आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. अमृता बऱ्याचवेळा पती हिमांशू मल्होत्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण काही दिवसांपूर्वी या लव्ह कपलमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चा अमृताने हिमांशूला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. पण अमृताने यावर वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

नुकताच अमृताने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली. दरम्यान तिला तिने हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे का? त्यांच्यात वाद सुरु आहेत का? यासर्व चर्चांविषयी विचारण्यात आले होते. त्यावर तिने ‘गेल्या काही दिवसांपासून हिमांशू चित्रीकरणासाठी घरापासून लांब आहे आणि मला त्याची आठवण येत होती. एक दिवस रात्री मला त्याची खूप आठवण येऊ लागली म्हणून मी त्याला फोन केला. मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत त्यामुळे मला त्याची आठवण येते हे मी त्याला सांगितले नाही. पण फोन केल्यानंतर तो सतत मला लवकर झोपाचं आहे, उद्या सकाळी ५ वाजता माझं शूट आहे हे बोलत होता. त्यामुळे आमच्यामध्ये वाद झाला आणि आम्ही फोन ठेवला. त्यानंतर रागाच्या भरात मी त्याचा नंबर ब्लॉक केला आणि सोशल मीडियावर त्याला अनफॉलो केले’ असे अमृता म्हणाली.

‘पण तेव्हा मी लहान मुलीसारखे वागले हे मला कळाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला अनब्लॉक केले. तेव्हा हिमांशू मला रात्रभर फोन करत असल्याचे मला कळाले. मला त्यावेळी राग आला होता म्हणून मी त्याला ब्लॉक केले होते. पण यासर्वामुळे माझ्यात आणि हिमांशूमध्ये वाद सुरु आहेत अशा चर्चा सुरु कशा होऊ शकतात हे मला कळालेच नाही’ असे अमृता म्हणाली.

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले. आज लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे.