‘खतरों के खिलाडी’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अॅडव्हेंचर शो आहे. हा रिअॅलिटी शो जिंकण्यासाठी स्पर्धकांना आपल्या भितीवर नियंत्रण मिळवावे लागते. या शोचे यंदाचे पर्व विशेष चर्चेत होते ते मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरमुळे. मात्र अमृताने ‘खतरों के खिलाडी’ला आता बाय बाय केलं आहे.

‘खतरों के खिलाडी’ या शोचे यंदा १०वे पर्व सुरु आहे. या पर्वात करण पटेल, शिविन नारंग, तेजस्वी प्रकाश, कॉमेडियन बलराज स्याल, करिश्मा तन्ना, भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी, अशा अनेक कलाकारांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. मात्र या सर्वांच्या तुलनेत अदा खान आणि अमृता खानविलकर यांचे गुण सर्वात कमी होते. परिणामी दोघांमध्ये एक टायब्रेकर राऊंड खेळला गेला.

या टायब्रेकर राऊंडमध्ये मगरीच्या पिल्लाला उचलून एका पेटीत ठेवायचे होते. या टास्कमध्ये अदाने बाजी मारली. तिने अमृतापेक्षा अधिक गुण कमावले. परिणामी शोच्या नियमानुसार अमृता ‘खतरों के खिलाडी’मधून बाद झाली.

या टीव्ही शोचा होस्ट रोहित शेट्टी याने मात्र अमृताची प्रचंड स्तुती केली. “अमृता एक उत्तम स्पर्धक आहे. हा शो जिकण्यासाठी तिने अफाट मेहनत केली. मात्र तिच्या नशिबाने तिला दगा दिला. त्यामुळे ती ‘खतरों के खिलाडी’मधून बाहेर जात आहे.” असं रोहित अमृताला निरोप देताना म्हणाला.