करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या कठिण काळात होणाऱ्या गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी म्हटले होते. त्यांच्या ट्वीटवर अभिनेते अनुपम खेर यांनी उत्तर देत ‘येणार तर मोदीच’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर यांचे हे ट्वीट चर्चेत आहे.

शेखर गुप्ता यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला होता. ‘मी नैसर्गिक आपत्ती, युद्ध, अन्नटंचाई अशा अनेक परिस्थिती पाहिल्या आहेत. पण फाळणीनंतर आलेले हे सर्वात मोठे संकट आहे आणि भारताने यापूर्वी कधीही असं अकार्यक्षम सरकार पाहिलं नव्हतं. कोणतेही नियंत्रण कक्ष नाही, कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. हा प्रशासनाचा अभाव आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.

आणखी वाचा : ‘दयाबेन’ हॉलिवूड चित्रपटामध्ये? पाहा मजेशीर व्हिडीओ

त्यांचे हे ट्वीट रिट्वीट करत अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे समर्थन केले असे म्हटले जात आहे. ‘आदरणीय शेखर गुप्ताजी. हे जरा जास्तच झालं. तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. करोनाही एक आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. आपण या माहामारीचा या पूर्वी कधीही सामना केला नव्हता. सरकारवर टीका करणे गरेजेचे आहे. पण करोनाचा सामना करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. घाबरु नका. येणार तर मोदीच’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.