वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या अभिनेत्री कंगना रणौतवरील टीकेचा सूर अजूनही कमी झालेला नाही. कंगना सातत्यानं कुणालातरी लक्ष करणारे ट्विट करत असून, त्यावरून तिच्यावर टीका केली जात आहे. कंगनानं क्षत्रिय असल्याचं ट्विट केलं होतं. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपनं सुनावलं आहे.

कंगनानं क्षत्रिय असल्याबाबत ट्विट केलं होतं. त्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपनं कंगनाला चीनविरोधात लढाई करण्याचा सल्ला दिला आहे. “ताई तू एकटीच आहे, एकटीच मणिकर्णिका. तू चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर. बघ किती आतमध्ये घुसले आहेत. त्यांनाही दाखवून दे की, तू आहेस तोपर्यंत कुणीही देशाच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुझ्या घरापासून एक दिवसाच्या अंतरावर आहे एलएसी. जा वाघिणी. जय हिंद,” असा टोला अनुरागनं लगावला आहे.

कंगनानं काय केलं होतं ट्विट?

“मी एक क्षत्रिय आहे. एकवेळ शिर कापलं तरी चालेल, पण झुकवणार नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवत राहिन. मान, सन्मान व स्वाभिमानानं जगले आहे आणि गर्वानं राष्ट्रवादी म्हणून जगत राहिल. सिद्धांतासोबत कधीच तडजोड केलेली नाही, करणार नाही. जय हिंद,” असं ट्विट कंगनानं केलं होतं. कंगनाच्या याच ट्विटवरून अनुराग कश्यपनं तिला चीनवर हल्ला करण्याचा सल्ला दिला आहे.