सोशल मीडियावरील ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याचं अधिकृत ट्विटर अकाऊंट डिअॅक्टीवेट केलं आहे. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन,मेसेज येत असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. अकाऊंट डिअॅक्टीवेट करण्यापूर्वी अनुरागने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने ट्विटर अकाऊंट डिअॅक्टीवेट करण्यामागचं कारण सांगितलं.

“ज्यावेळी तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येऊ लागतात आणि तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकी मिळते, त्यावेळी सारेच जाणतात की या मुद्द्यावर कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही. हे कुठलंही कारण किंवा तर्क नाही. भामटे राज्य करतील आणि भामटेपणा हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत होईल. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा”, असं अनुरागने म्हटलं आहे.

तो दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतो, “तुम्हा सगळ्यांना यश आणि सुख मिळावं ही इच्छा. हे माझं अखेरचं ट्विट आहे. कारण मी माझं ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलतच नाही. गुड बाय”.

दरम्यान, ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टपणे विचार मांडणारा अनुराग अनेक वेळा त्याच्या वक्तव्यांमुळे ट्रोलही होत असतो. काही दिवसापूर्वी त्याने जम्मू-काश्मीरबाबतच्या ३७० कलम हटवण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले होतं. कलम ३७० हटवण्याचे काम ज्या पद्धतीने करण्यात आले आहे ते भीतीदायक असून चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे, असे त्याने म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यावरुन त्याच्यावर अनेक स्तरांमधून टीका करण्यात आली होती. सध्या अनुराग त्याच्या ‘आगामी सांड की आंख’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिका साकारणार आहेत.