दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनपासून अभिनेत्री तापसी, अनुराग व कंगना रणौत यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली होती. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग व तापसीने कंगनाची मस्करी केली होती. तेव्हापासून सुरू झालेला या तिघांमधील वाद आता आणखीनच वाढला आहे. मात्र त्या मुलाखतीनंतर मी कंगनाला फोन करून तिची माफीसुद्धा मागितल्याचं अनुरागने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला, “तापसीसुद्धा माझी मैत्रीण आहे आणि कंगनासुद्धा. या दोघी माझ्या मैत्रीणी असताना मी त्यांच्याविरोधात जाऊन का मस्करी करेन? तुला वाईट वाटलं असेल तर मी तुझी माफी मागतो, असं मी कंगनाला फोनवर म्हटलं होतं. मित्र अशाचप्रकारे भांडणं मिटवतात. पण आता तिचा पावित्रा असा आहे की जर तू माझ्या बाजूने नसशील तर तू माझा शत्रू आहेस.”

वादाची सुरुवात कशी झाली?

‘मनमर्जियाँ’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तापसी व अनुरागला कंगनावरून प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला कंगनाला एखादी वस्तू भेट देण्याची संधी मिळाली तर काय देणार, असा तो प्रश्न होता. यावर तापसीने उत्तर दिलं की, ‘डबल फिल्टर’. तापसीची ही मुलाखत पाहिल्यानंतर कंगनाच्या बहिणीने तिला ‘सस्ती कॉपी’ म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. इथूनच वाद सुरु झाला.

हा वाद पुढे बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर येऊन आणखी वाढला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने तापसी पन्नू व स्वरा भास्करला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणत हिणवलं. यावर तापसीनेही तिला सडेतोड उत्तर दिलं होतं.