सध्या चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा अनुरागने अभिनेत्री कंगना रणौतने घराणेशाही या वादावरुन केलेल्या वक्तव्यावर टीका केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता नेटकऱ्यांनी देखील अनुरागवर निशाणा साधला आहे. एका ट्रोलरने तर अनुरागला ‘एक पत्नी सांभाळली जात नाही आणि लोकांना ज्ञान वाटण्यासाठी चालला’ असे म्हणत सुनावले होते. अनुरागने त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.

अनुरागने ट्विटरद्वारे त्या ट्रोलरला उत्तर दिले आहे. ‘एखाद्या महिलेला सांभाळावे लागत नाही. ती स्वत:ला सांभाळू शकते. तसेच तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबीयांना देखील ती योग्य पद्धतीने सांभाळते. जेव्हा तिला हे जमले नाही ती सोडून गेली. ती माझी गुलाम नव्हती तर मी तिला बांधून ठेवेन. बाकी तूझ्या आयुष्यात सगळं ठिक सुरु आहे ना?’ असे म्हणत अनुरागने ट्रोलरला सुनावले आहे.

अनुराग पहिल्यांदाच ट्रोल झालेला नाही. त्याने कंगनाने घराणेशाही या वादावर केलेल्या वक्तव्यावर टीका केल्यामुळे देखील ट्रोल झाला होता. त्याने मनिकर्णिका या चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करत कंगना माझी खूप चांगली मैत्रीण होती. पण आताच्या नवीन कंगनाला मी ओळखत नाही असे म्हटले होते. त्यावेळी देखील त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

अनुराग कश्यपने पहिले फिल्म एडिटर आरती बजाजशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. पण काही कारणास्तव त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनुरागने अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केले. पण त्याचा हा संसारही फार काळ टिकला नाही.