सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरु असताना एका अज्ञात तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक विद्यार्थी देखील जखमी झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने जामिया परिसरात जाण्यापूर्वी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यानंतर गोळीबार केला. या गोळीबाराला भाजपा जबाबदार आहे. असे मत अनुराग कश्यपने सोशल मीडियाव्दारे व्यक्त केले आहे. “मुबारक हो टुकडे टुकडे भाजपा” असे म्हणत त्याने आपला संताप व्यक्त केला.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर नेहमीच व्यक्त होताना दिसतो. यावेळी त्याने जामिया येथे झालेल्या गोळीबारावर ट्विट केले आहे.

काय म्हणाला अनुराग कश्यप?

“जय श्रीराम व भारत माता की जय म्हणा आणि हिंदूत्वाच्या नावाखाली वाट्टेल ते करा. तुम्हाला थांबवणारं कोणी नाही. कारण आता असा संशय येतोय की सरकारच दहशदवादाला पाठिंबा देत आहे.”

यानंतर अनुरागने आणखी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तो म्हणाला की,

“आश्चर्याची गोष्ट आहे सर्व हिंदूत्ववादी दहशतवाद्यांना वाटते की ते देशभक्त आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाने गेल्या सहा वर्षात हे साध्य करुन दाखवले. अभिनंदन तुकडे तुकडे भाजपा”

अनुराग कश्यपचे हे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी अनुरागवर टीका देखील केली आहे.