बॉलिवूडमध्ये ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘देवदास’ यांसारखे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणारे संजय लीला भन्साळी आता सलमानसोबत नवीन चित्रपट घेऊन येत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी भन्साळी आणि सलमान खान एकत्र काम करणार होते. या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्माचं नाव चर्चेत होतं. मात्र अनुष्कानं भन्साळीसोबत कोणत्याही चित्रपटाचा करार केला नसल्याचं तिच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे.

अनुष्काला भविष्यात भन्साळींसोबत काम करायला आवडेल. पण तुर्त तरी तिला कोणत्याही चित्रपटासंदर्भात भन्साळींकडून विचारणा झालेली नाही. त्यामुळे तिनं अद्यापही कोणताही करार केला नाही. असं तिच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. सलमाननं या चित्रपटासाठी अनुष्काचं नाव सुचवल्याचं म्हटलं जात होतं. २०१६ मध्ये आलेल्या ‘सुलतान’ या चित्रपटात सलमान अनुष्का एकत्र दिसले होते. या दोघांची जोडी सर्वांनाच खूप आवडली होती.

सध्या अनुष्का ‘झिरो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का हे त्रिकूट पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी तिघांनी ‘जब तक है जान’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. २१ तारखेला ‘झिरो’ प्रदर्शित होत आहे.