सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची पहिलीवहिली वेब सीरिज ‘पाताल लोक’ चर्चेत आहे. सीरिजमधील पात्र प्रेक्षकांना विशेष आवडत असल्याचे दिसत आहे. पण आता एका वेगळ्या कारणामुळे सीरिज चर्चेत आहे. या चर्चा लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी सीरिजची निर्माती अनुष्का शर्माला कायेदशीर नोटीस बजावल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

अनुष्काला १८ मे रोजी पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या शब्दांच्या वापरामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचे म्हटले आहे.

‘द क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘या सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये एक महिला पोलीस अधिकारी दिसत आहे. ती चौकशीदरम्यानच्या दृष्यामध्ये नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीचा त्याच्या जातीवरुन उल्लेख करते. केवळ नेपाळी शब्दांचा वापर करण्यात आला असता तर आम्हाला कोणतीही समस्या नव्हती. मात्र त्यानंतर वापरण्यात आलेला शब्द आम्हाला मंजूर नाही. अनुष्का शर्मा या सीरिजची निर्माती असल्यामुळे तिला नोटीस पाठवण्यात आली आहे’ असे गुरुंग यांनी अनुष्काला पाठलेल्या लीगल नोटीसमध्ये म्हटले आहे. अनुष्काला पाठवण्यात आलेल्या नोटीसवर तिने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, गोरखा सुमदायने जातीवाचक शब्द वापरल्यामुळे नाराजी व्यक्ती केली असून हा शब्द सीरिजमधून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. १८ मे रोजी या विरोधात ऑनलाइन पेटीशन दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पेटीशनमध्ये सीरिजमधील हा शब्द म्यूट करण्यात यावा आणि सबटायटलमध्ये ब्लर करण्याची मागणी केली जात आहे.

‘पाताल लोक’ ही वेब सीरिज १५ मे पासून अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. या थ्रीलर क्राईम सीरिजमध्ये जयदीप अल्हावत, गुल पनाग, स्वास्तिका मुखर्जी हे कलाकार अभिनय करताना दिसत आहेत. NH10 आणि उड़ता पंजाबचे लेखक सुदीप शर्मा यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे.