अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी मे २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. एकीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेअरविषयी जोरदार चर्चा आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने दुसऱ्या लग्नाविषयी आणि मलायकासोबतच्या घटस्फोटाविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे.

“मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर लग्नसंस्थेवर विश्वास आहे का ?” असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अरबाज म्हणाला, “तुम्ही मरणार आहात हे जर का तुम्हाला समजलं, तर त्या क्षणापासून तुम्ही जगणं सोडून देता का ? नाही ना ? तुम्ही जगणं सुरुच ठेवता कारण या समाजाच्या तुमच्याकडून कायम काही ना काही अपेक्षा असतात”.

पुढे तो म्हणतो, “लग्न केल्यानंतर तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल होतो. जीवनात स्थिरता येते. त्यामुळे कुटुंब बांधून ठेवायला लग्न संस्था हा उत्तम पर्याय आहे”.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायकानेदेखील अरबाजसोबतच्या घटस्फोटाविषयी तिचं मत व्यक्त केलं होतं. ‘घटस्फोटामुळे मला आयुष्यात पुढे जाण्याचं आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. भूतकाळातील गोष्टींच्या तणावाशिवाय मी हे करू शकले,’ असं ती यावेळी म्हणाली होती.