बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझं करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. त्याची पोस्ट तुफान व्हायरल झाली. त्यानंतर आता सलमान खानचा भाऊ अरबाज खानने या वादावर वक्तव्य केले आहे.

नुकताच अरबाजने बॉम्बे टाइम्सला या संदर्भात मुलाखत दिली. त्यावेळी त्याने अभिनव कश्यप विरोधात लिगल अॅक्शन घेण्यात येईल असे म्हटले. तसेच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने ‘अभिनवच्या पहिल्या पोस्ट नंतरच आम्ही त्याच्यावर लिगल अॅक्शन घेतली आहे’ असे अरबाजने म्हटले आहे.

तसेच सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी देखील यावर वक्तव्य केले आहे. अभिनवला जे करायचे आहे ते करु द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही असे सलीम खान यांनी म्हटले होते.

काय होते अभिनव कश्यपचे आरोप?

सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांमुळे माझे करिअर संपले. त्यांच्यामुळे ‘दबंग २’ हा चित्रपट माझ्या हातून गेला. अरबाजने माझ्या हातून तो प्रोजेक्ट काढून घेतला होता. नंतर त्यांनी माझ्यासोबत काम करणाऱ्या निर्मात्यांना धमक्या दिल्या. तसेच माझ्या कुटुंबीयांतील महिलांवर बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या असे आरोप अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर केले.