अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला आपण नेहमीच हसताना, लहान मोठ्या गोष्टींचा आनंद लुटताना पाहतो. पण त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्यांचं प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडाला होता. अर्चना यांचं लग्न फार कमी वयात झालं होतं आणि काही कारणास्तव हे लग्न टिकू शकलं नाही.

लग्नाविषयी त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “पहिल्या लग्नात अपयश मिळाल्यानंतर मला माझ्या आयुष्यात पुन्हा कोणताच पुरुष नको होता. मात्र परमीतला भेटल्यानंतर माझी विचारसरणी बदलली. पुरुषसुद्धा प्रेमळ, काळजी घेणारे असू शकतात हे मला परमीतला भेटल्यावर समजलं.” लग्नापूर्वी परमीत-अर्चना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही कधीच लग्न करणार नव्हतो पण समाज आणि कुटुंबीयांमुळे आम्ही लग्नगाठ बांधली असंही ती सांगते.

https://www.instagram.com/p/B1soDqSlb81/

३० जून १९९२ साली हे दोघं विवाहबद्ध झाले. आमच्या मुलांना ओळख मिळावी म्हणून आम्ही लग्न केलं, असं अर्चना सांगते. “जवळपास चार वर्षे आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो. आमच्या लग्नाला फार लोकं उपस्थित नव्हते. त्यामुळे लग्नानंतरही चार वर्षे आम्ही लोकांना सांगितलं नव्हतं की आमचं लग्न झालं आहे. कारण लग्न ही गोष्ट तेवढी महत्त्वाची वाटली नव्हती. लग्न हे नात्याला दिलेलं एक नाव आहे. लिव्ह इनमध्ये असतानाही आम्ही एकमेकांना तेवढीच साथ दिली. कदाचित आम्ही लग्न केलंही नसतं. पण आमच्या मुलांना ओळख मिळावी म्हणून लग्नगाठ बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला. आजही मी आणि परमीत एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत”, असं अर्चनाने सांगितलं.