‘द कपिल शर्मा’ फेम अर्चना पुरण सिंग ही त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफलामुळे सतत चर्चेत असते. अर्चना आणि परमीत सेठी २९ वर्षापूर्वी लग्न बंघनात अडकले. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. पण हे अर्चना यांचे दुसरे लग्न आहे. त्यांचा पहिला संसार फार काळ टिकला नाही. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर अर्चना यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्यांची भेट परमीत यांच्याशी झाली. मग काही दिवस लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर ३० जून १९९२ रोजी ते लग्न बंधनात अडकले.

अर्चना यांचे पहिले लग्न तुटल्यानंतर त्यांचा प्रेमावर विश्वास नव्हता. पण परमीत यांनी त्यांना पुन्हा प्रेम करायला शिकवले. दोघांची लव्ह स्टोरी एका इवेंट दरम्यान सुरू झाली. परमीत यांना पहिल्यांदा पाहताच अर्चना त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या . त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी प्रेमाची कबुली दिली. लग्न करण्यापूर्वी ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये अर्चना यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता.

अर्चना यांनी रात्री ११ वाजता लग्न करायचे ठरवले होते. त्यानंतर सर्व तयारी करण्यात आली होती. पण जेव्हा लग्नाचे विधी करण्यासाठी भटजींना बोलवण्यात आले तेव्हा त्यांनी असे लग्न होऊ शकत नाही असे सांगितले. लग्नासाठी मुहूर्त काढावा लागतो असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी भटजींनी सांगितल्या प्रमाणे अर्चना यांनी मुहूर्त काढून लग्न केले.

अर्चना यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लग्नाला परमीत यांच्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले होते. अर्चना यांचे चित्रपटांमध्ये काम करणे परमीत यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. पण घरच्यांच्या विरोधात जाऊन अर्चना यांनी लग्न केले. तसेच त्यांनी हे लग्न केल्याचे कुटुंबीयांपासून ४ वर्षे लपवून ठेवले होते.